प्रतिनिधी / वाठार किरोली
पुणे विभागातील भाजपाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सातारा जिल्ह्यातून दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन नामदार सहकारमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी रहिमतपूर येथे केले. रहिमतपूर मधील वीरशैव तिरळी समाज जंगम मठात पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील होते. व्यासपीठावर राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, आदी मान्यवर उपस्थित होते.
नामदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले आपले नेते माननीय शरदरावजी पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील महा विकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक जयंत आसगावकर यांना सातारा जिल्ह्यातून प्रचंड मताधिक्य देऊन विक्रमी मतांनी निवडून आणूया.
प्रा. नितिन बानगुडे पाटील म्हणाले ,पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवायची आणि निवडणून आल्यावर पदवीधर विसरून जायचे मागची आश्वासन विसरून पुन्हा मत मांडायचे असे राजकारण भाजप आतापर्यंत करत आले आहे. यापुढे चालणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवून पुणे विभाग पदवीधर मतदार संघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील.
यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार,शिवसेना नेते माजी नगराध्यक्ष वासुदेव माने ,सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची भाषणे झाली. आजी-माजी नगरसेवक रहिमतपुर परिसरातील विविध गावचे सरपंच ,उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस ,शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.