उच्च शिक्षणमंत्री अश्वथ नारायण यांचे आश्वासन : जीएसएस कॉलेजमध्ये फिजिक्स-झूलॉजी पीजी अभ्यासक्रमाचे उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. याच धर्तीवर बेळगाव हेसुद्धा शिक्षणाचे माहेरघर बनविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आयआयटीपेक्षाही चांगल्या दर्जाचे शिक्षण विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) मध्ये दिले जाणार आहे. टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन क्षेत्रात कर्नाटक अग्रेसर आहे. देशभरातील लोक आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बेंगळूरमध्ये येत आहेत. पुढील काही वर्षांमध्ये परदेशापेक्षाही उत्तम शिक्षण कर्नाटकात दिले जाईल, असा विश्वास उच्चशिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी व्यक्त केला.
एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेजमध्ये फिजिक्स व झूलॉजी या दोन पी. जी. अभ्यासक्रमांच्या शाखांचे मंगळवारी उच्चशिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणासोबतच राज्यातील नव्या उपक्रमांविषयी माहिती दिली. व्यासपीठावर विधानपरिषद सदस्य अरुण शहापूर, संस्थेचे उपाध्यक्ष एस. व्ही. शानभाग, गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्या बिंबा नाडकर्णी, प्राचार्य बी. एल. मजुकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा करणार कौशल्यविकास
प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. परंतु बऱयाच वेळा त्यांना ती संधी उपलब्ध होत नाही. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून, अशा तरुणांचा कौशल्यविकास करण्यासाठी राज्य सरकारने नवी योजना आखली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्य देऊन नोकरी, व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा दिली जाणार आहे. राज्यातील एकही तरुण बेरोजगार राहणार नाही यासाठी कौशल्यविकास केला जाणार असल्याची माहिती उच्चशिक्षण मंत्र्यांनी दिली.
बेळगावचा परिसर अल्हाददायक
बेळगाव हे नैसर्गिक योगदान लाभलेले शहर आहे. येथील वातावरण मला नेहमीच भावते. मी माझ्या हायस्कूल जीवनापासून बेळगावमध्ये येतो. बेळगावमध्ये अनेक बदल होत असून, एक स्वच्छ सुंदर बेळगाव देशासमोर येत आहे. शैक्षणिक क्षेत्रात मला अनेक बदल घडवायचे असून, त्यासाठी प्रत्येक बेळगावकराचे मला सहकार्य हवे आहे. मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱया एसकेई सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन उच्चशिक्षण मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिले.
विधानपरिषद सदस्य अरुण शहापूर म्हणाले, देशात सर्वात पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कर्नाटकात लागू करण्यात आले. यात मोलाचा वाटा उच्चशिक्षण मंत्री अश्वथ नारायण यांचा होता. त्यांच्याच नेतृत्वाखाली आयटीबीपी, स्टार्टअप या क्षेत्रात मोठे बदल होत आहेत.
जीएसएस हे राज्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय असून एखाद्या विद्यापीठापेक्षाही या कॉलेजचा परिसर सुंदर आहे. बेळगावमधील शिक्षणसंस्था या देणगीतून सुरू असून, त्यांनी आजही आपली गुणवत्ता राखून ठेवली आहे. संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून ऑटोनॉमस कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न असून, त्याला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन शहापूर यांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात कृतिका व तिच्या सहकाऱयांच्या स्वागतगीताने झाली. बिंबा नाडकर्णी यांनी एसकेई सोसायटीच्या प्रगतीविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात एस. व्ही. शानभाग यांनी उच्चशिक्षण मंत्र्यांचे आभार मानत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कॉलेज अग्रेसर राहील, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुजा नाईक यांनी केले. डॉ. पी. टी. हणमगौड यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला एसकेई सोसायटीचे संचालक मंडळ, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.