लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील संघर्षावर भारतीय सेनेची रोखठोक बाजू मांडणारी लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांची एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने घेतलेली प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. पँगाँग परिसरातून चिनी सेना एप्रिल 2020च्या पूर्वी असणाऱया स्थितीत जात असताना आणि तणाव काहीसा निवळत असताना प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचे कारण असे की, हा संघर्ष सुरू झाला तेव्हापासून भारताने चीनसमोर शरणागती पत्करली, 1,300 चौरस कि.मी.पेक्षा अधिक भूमी गमावली, चीन पुढे सरसावतो आहे हे भारताच्या लक्षातच आले नाही किंवा त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले, पंतप्रधान मोदी भेकड आहेत, इत्यादी विकृत आरोपांची राळ विरोधी पक्षांनी आणि ‘देशभक्ती’ हा शब्दही ज्यांच्या दृष्टीने निषिद्ध आणि त्याज्य आहे, अशा तथाकथित पुरोगाम्यांनी त्यांच्या हाताला येईल त्या माध्यमांमधून उडवून दिलेली होती. भारताच्याच विरोधात भारतातच रान पेटविण्याची ही प्रक्रिया अगदी परवापरवापर्यंत म्हणजे पँगाँग भागातून चीन मूळच्या स्थानी जाईपर्यंत सुरू होती. ती कोणतेही जनहित साधण्यासाठी नव्हती, तर स्वतःचा राजकीय कार्यक्रम पुढे रेटण्यासाठी होती हे या मुलाखतीतून निर्विवादपणे सिद्ध होत आहे. ले. ज. वाय. के. जोशी हे केवळ अभ्यासक किंवा सामरिक तज्ञ नव्हेत, तर प्रत्यक्ष संघर्ष भूमीवर भारतीय सेनेचे नेतृत्व करणारे विद्यमान सेनाधिकारी आहेत. लडाख येथील नेमकी परिस्थिती त्यांच्याइतकी कोणालाही माहीत नाही, हे निश्चित आहे. त्यामुळे केवळ कल्पनेच्या आधारावर आरोपांच्या वावडय़ा ते उठविणार नाहीत, हे देखील स्पष्ट आहे. ‘भारताने चीनला आपली कोणतीही भूमी घेऊ दिलेली नाही. या सर्व संघर्षातून चीनने केवळ स्वतःच्याच तोंडाला काळे फासून घेतले आहे. चीनने स्वतःचीच अप्रतिष्ठा ओढवून घेतली आहे,’ असे वस्तुस्थितीदर्शक विधान त्यांनी या मुलाखतीत केले आहे. सर्व भारतीयांना आपल्या सैनिकांच्या पराक्रमाचा आणि अत्यंत दुर्धर अशा परिस्थितीत चीनसारख्या आक्रमक देशाच्या सैन्याशी दोन हात करताना त्यांनी प्रदर्शित केलेल्या अतुलनीय निर्धाराचा अत्याधिक अभिमान वाटावा, असेच हे विधान आहे. गेल्या दहा महिन्यांच्या संघर्षात प्रथमच भारतीय सेनेच्या उच्चपदस्थ आणि उत्तरदायी अधिकाऱयाने ठामपणे केलेली ही विधाने लडाख येथे नेमके काय घडत आहे, यावर झगझगीत प्रकाश टाकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी अनेकदा हीच स्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चीनला एक इंचही भूमी घेऊ देण्यात आलेली नाही, हे त्यांनी निक्षून आणि ठासून सांगितले होते. पण त्यांच्या या वक्तव्यांनाच आरोपीच्या पिंजऱयात उभे करण्याचा प्रयत्न विरोधक आणि त्यांच्या ओंजळीने पाणी पिणारे पुरोगामी यांनी केला. अद्वातद्वा भाषा करून, सरकारवर विनाकारण आगपाखड करून आणि हेत्वारोपांची मालिका सादर करून सर्वसामान्य भारतीयांच्या मनात आपलेच सरकार आणि सेना यांच्यासंबंधी संशय निर्माण करण्याची ही जणू मोहीमच होती. तथापि, हे बदनामीचे तंत्र त्यांच्यावरच उलटणार होते. तसेच झाले. आता तोंड लपविण्याची पाळी आरोपकर्त्यांवर आली आहे. मुलाखतीत जे म्हटले आहे ते समजून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. लडाखच्या पँगाँग, देपसांग, गोग्रा, उष्ण झरे आणि गलवान इत्यादी परिसरात गेले दहा महिने भारतीय सेना चिनी सेनेच्या डोळय़ाला डोळा भिडवून उभी आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमा निर्धारित नाही. त्यामुळे ज्याचे सैनिक जेथे उभे असतील तीच त्या देशाची सीमा मानली जाते. यालाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असे म्हणतात. चीनचे सैनिक जेथे नेहमी उभे असतात ती रेषा आणि भारताचे सैनिक जेथे उभे राहतात ती रेषा यांच्यात प्रत्येक स्थानी काही कि.मी.चे अंतर असते. या मधल्या अंतराला निर्मनुष्य भूमी किंवा नो मेन्स लँड म्हणतात. या भूमीवर दोन्ही देश आपले स्वामित्व सांगतात. तसेच तेथे गस्त घातली जाण्याचीही प्रथा आहे. भारताच्या नियंत्रण रेषेपर्यंत चीनचे सैनिक गस्त घालतात तर चीनच्या नियंत्रण रेषेपर्यंत भारताचे सैनिक गस्त घालतात. पँगाँगपुरते बोलायचे तर हा मधला भाग फिंगर 3 ते फिंगर 8 पर्यंत आहे. इतर संघर्ष बिंदूंवरही अशीच स्थिती आहे. मे मध्ये चीनने फिंगर 8 ओलांडून फिंगर 4 पर्यंत आपले सैनिक आणले, तसेच या भागात सैनिकी चौक्या, बंकर्स बांधले व मोठा शस्त्रसंभार आणला. भारतानेही चीनला रोखण्यासाठी फिंगर 4 पर्यंत आपली सेना आणली आणि चीनची पुढची वाटचाल रोखली. गलवानचा 20 जूनच्या मध्यरात्रीचा संघर्ष चीनच्या पुढे येण्याच्या प्रयत्नातूनच ओढवला. या हाणामारीत भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले, तसे चीननेही 45 किंवा त्याहीपेक्षा जास्त सैनिक गमावले. पुढे येणाऱया चीनच्या सेनेवर मागे जाण्याचा दबाव टाकण्यासाठी भारताने आजूबाजूच्या कैलास पर्वतरांगेतील अनेक शिखरे चपळाईने ताब्यात घेतली आणि चिनी सैन्यावर उंचावरून लक्ष ठेवण्याची क्षमता प्राप्त केली. याचा परिणाम असा झाला की, प्रत्यक्ष युद्ध झाले असते तर भारताला उंचीचा लाभ मिळून चिनी सैनिकांना दणका देणे शक्य झाले असते. हे लक्षात येताच, आपली डाळ शिजणार नाही हे चीनच्या लक्षात आले आणि आणखी हसे करून घेण्यापेक्षा त्याने माघार घेणे श्रेयस्कर मानले. थोडक्यात, योग्यवेळी योग्य पावले उचलून भारतीय सेनेने चीनला पूर्वीच्या स्थितीत जाणे भाग पाडले. हा संघर्ष या निर्मनुष्य भूमीत झाला आहे. भारतात चीनने घुसखोरी केल्यामुळे नव्हे. तसेच चीन जो मागे जातो आहे तो भारताच्या भूमीतून नव्हे, तर याच निर्मनुष्य भागातून मागे जात आहे. याचाच अर्थ असा की चीनला भारताचा कोणताही भाग गिळंकृत करणे शक्य झालेले नाही. या सर्व सत्य बाबी या मुलाखतीतून स्पष्ट होतात. इतरही अनेक मुद्दे आहेत. पण जागेअभावी आताच त्यांचा परामर्श घेणे शक्य नाही. तेव्हा आपल्या सेनेचा पराक्रम आणि आपल्या सरकारचे धोरण यांच्यासंदर्भात जनतेची दिशाभूल करण्याचा राजकीय धंदा आता संबंधितांनी थांबविल्यास ते चांगले होईल.
Previous Article‘पेयजल’चा शिल्लक निधी योजनांवर करावा खर्च
Next Article झोळंबेतील काविकलेचा वारसा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.