आ. शिवेंद्रसिंहराजे; नागरिकांना वेठीस न धरण्याच्या अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ सातारा
वाय. सी. कॉलेजने कोणालाही पूर्वसूचना न देता काम सुरु केल्याने शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. यामुळे गेले पाच दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पालिकेतील सत्ताधाऱयांना नागरिकांच्या प्रश्नाचे सोयरसुतक नसल्याने कोणीही इकडे फिरकले नाही. एकप्रकारे नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला असून पालिकेला मिळालेला पुरस्कार घेण्यासाठी पुढे- पुढे करणारे आता कुठे गेले, असा खोचक आणि वास्तववादी सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित केला. दरम्यान, नागरिकांना वेठीस धरू नका अशा सक्त सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱयांना केल्या.
वाय. सी. कॉलेजमध्ये बोटॅनिकल गार्डन तयार करण्याचे काम सुरु असून यासाठी सपाटीकरण सुरु असताना शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारी रायजिंग मेन लाईन फुटली. यामुळे गेले पाच दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाणीपुरवठा त्वरित पूर्ववत सुरळीत व्हावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी घटनास्थळाला भेट देऊन प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना सूचना केल्या. यावेळी नगरसेवक शेखर मोरे- पाटील, फिरोज पठाण, रवी पवार, पोपट मोरे, वाय. सी. कॉलेजचे प्राचार्य बी. टी. जाधव, निकम सर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चौघुले मॅडम, जंगम शिंदे आदी अधिकारी, ठेकेदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
वास्तविक वाय. सी. कॉलेज प्रशासनाने याबाबत पालिकेचा पाणीपुरवठा विभाग अथवा प्राधिकरणाला सूचना देणे अपेक्षित होते. कॉलेज प्रशासनाने हि बाब गांभीर्याने घ्यावी, यापुढे असे प्रकार करू नयेत असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. दरम्यान, टेंडर अथवा खाबुगिरीचा विषय असता तर सगळे दिसले असते. पण, नागरिकांच्या समस्यांचे सत्ताधाऱयांना काहीही देणे घेणे नाही. गेले पाच दिवसांपासून नागरिकांना पाणी नाही. पालिकेकडून टँकरही नाही, यासारखे सातारकरांचे दुर्दैव नाही. सत्ताधाऱयांमधील एकही जण इकडे फिरकला नाही. ना नगराध्यक्ष मॅडम, ना उपाध्यक्ष, ना नगरसेवक, ना मुख्याधिकारी आणि ना कोणताही अधिकारी! पुरस्कार घेण्यासाठी जे दिसले तेही इथे दिसले नाहीत, आता ते कुठे गेले? असा खोचक सवाल शिवेंद्रसिंहराजेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला. जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करा आणि यापुढे नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार कोणी करू नका, अशा सक्त सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱयांना केल्या.