धामापूर घारेवाडीतील घटना
संगमेश्वर / प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यात गत आठवडाभर जोरदार पाऊस पडत आहे . नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. अशा स्थितीत पाण्याचा प्रवाह वेगवान असतांना पोहण्यासाठी उतरलेल्या सहा मुलांपैकी दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे . सदरची घटना धामापूर घारेवाडी येथे घडली आहे .
संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील धामापूर घारेवाडी येथे आज दुपारी ३ : ३० च्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण ( ३२ ) , चेतन सूर्यकांत सागवेकर ( १८ ) दोघेही रा . धामापूर घारेवाडी हे गायमुख परिसरात वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याबरोबर वाहत जावून या दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी दिली . या मुलांसोबत असणाऱ्या औदुंबर प्रकाश पवार ( २७ ) , शुभम शांताराम चव्हाण ( २० ) , राज तुकाराम चव्हाण ( १८ ) , साईल संतोष कांगणे ( १७ ) या चौघांनी बुडणाऱ्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्यांना यश आले नाही .
संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे आपले सहकारी ए. एस . आय. शिंदे,पो . हे . कॉ . झापडेकर,पो . ना . मोंडे, मानके , गायकवाड यांच्यासह तातडीने घटनास्थळी पोहचले आणि पंचनामा करुन तपासकार्य सुरु केले . या दुर्दैवी घटनेमुळे धामापूर घारेवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .