खळबळजनक गूढ हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संशय कधीच पुराव्याची जागा घेऊ शकत नाही, हा संशय कितीही दाट असला तरीही त्याला पुराव्याचे स्थान घेता येत नाही. संशयातीत दोषी सिद्ध होईंपर्यंत कुठल्याही आरोपीला निर्दोष मानले जाते असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने ओडिशा उच्च न्यायालयाचा एक निर्णय कायम ठेवत आरोप सिद्ध करता येईल अशाप्रकारचे पुरावे आरोपीच्या विरोधात असावेत असे म्हटले आहे.
ओडिशा उच्च न्यायालयाने वीजेचा झटका देत एका होमगार्डची हत्या करण्याप्रकरणी दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष ठरविले होते. संशय कितीही दाट असला तरीही पुराव्याची जागा घेऊ शकत नाही या न्यायतत्वाला अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
विजय कुमार टाडू हे चंदाबली पोलीस स्थानकात तैनात होते. त्यांना बानाबिहारी महापात्र, त्यांचा मुलगा लूजा आणि काही इतरांनी विषारी पदार्थ खायला देत विजेचा झटका देत मारल्याची तक्रार विजय यांची पत्नी गीतांजलि यांनी केली होती. मृत्यू विजेच्या झटक्यामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होते. पण हे हत्येचे प्रकरण आहे यासंबंधी कुठलाच निष्कर्षात्मक पुरावा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
मृत व्यक्ती आरोपीच्या खोलीत पडला होता आणि संबंधितांनी तक्रारदाराला तिचा पती निष्क्रीय अवस्थेत असल्याचे कळविले होते. यातून प्रतिवादींनी हत्या केल्याचे सिद्ध होत नाही. सरकारी पक्ष आरोपींचा दोष सिद्ध करण्यास अपयशी ठरला असून न्यायालयाने आरोपींना निर्दोष ठरवून योग्य निर्णय घेतल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
गुन्हा सिद्ध करता येईल अशाप्रकारचे परिस्थितीजन्य पुरावे असावेत. संशयाला जागा राहणार नाही अशाप्रकारच्या पुराव्यांची साखळी असावी. आरोपींनी तक्रारदारच्या पतीला मद्य पाजल्याची मोठी शक्यता आहे, तर शवविच्छेदन करणाऱया डॉक्टरनुसार झोपतेवेळी दुर्घटनेतून वीजेच्या तारेशी त्याचा संपर्क आला असू शकतो असे खंडपीठाने म्हटले आहे.