प्रतिनिधी/ बेळगाव:
दहावी, बारावीच्या परीक्षेनंतर उत्तर पत्रिका तपासणीतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांना कमी, जास्त गुण मिळतात. असे अनेक प्रकार यापूर्वीही घडले आहेत. आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांना गुण कमी मिळाले की मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे साहजिकच पुर्नतपासणीसाठी त्यांची धडपड सुरु होते. पुर्नतपासणीत त्यांना न्यायही मिळतो.
जोशीमळा, खासबाग येथील अंकिता अनिल बाहेती या बारावीच्या विद्यार्थिनीला निकालात 91.16 टक्के गुण मिळाल्याचे दिसून आले होते. आपण चांगल्या पध्दतीने परीक्षा देवूनही कमी गुण का मिळाले, या विचारातून विद्यार्थिनीने वडिलांच्या मदतीने पुर्नतपासणीसाठी अर्ज केला.
जैन कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत शिकलेल्या अंकिताला पुर्नतपासणीनंतर 16 गुण अधिक मिळाले आहेत. तर साहजिकच तीची टक्केवारी वाढली आहे. ती आता 94 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. सुरुवातीला मात्र निकाल पाहिल्यानंतर अंकिताला धक्का बसला होता. कारण जादा गुण मिळणार याचा विश्वास त्या विद्यार्थिनीला होता. अखेर तो विश्वास खरा ठरला आणि तिला वाढीव गुण मिळाले.
चुकीच्या निकालामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होतो. कुटुंबियांनाही त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. केवळ माझ्या मुलीचीच अशी परिस्थिती झाली आहे असे नाही. उत्तर पत्रिका तपासणीतील गोंधळामुळे चुकीचा निकाल हाती येतो व विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. याला जबाबदार कोण? असा प्रश्न अंकिताचे वडीलांनी उपस्थित केला आहे.