भाजपची मागणी : तहसीलदारांना निवेदन
वार्ताहर / सावंतवाडी:
23 जुलैच्या पुरात सावंतवाडी तालुक्यातील माडखोल ते इन्सुली भागात मोठय़ा प्रमाणात शेती, बागायती व घरांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करण्यात आले असून नुकसानीचा आकडाही निश्चित करण्यात आला आहे. या नुकसान भरपाईची रक्कम शासनाने मंजूर केली आहे. ही भरपाई गणेश चतुर्थीपूर्वी नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा करावी, या मागणीचे निवेदन भाजपतर्फे सावंतवाडी नायब तहसीलदार मुसळे यांना देण्यात आले. त्यांनी येत्या चार दिवसात नुकसान भरपाई खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, माजी उपसभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती मानसी धुरी, उमेश पेडणेकर, विठ्ठल पालव, महेश धुरी, उमेश कोठावळे, औदुंबर पालव, मंडल अध्यक्ष महेश धुरी, मधुकर देसाई, प्रवीण देसाई उपस्थित होते. या पुरात शेतकऱयांची घरे, शेती, बागायती, गोठय़ांचे मोठे नुकसान झाले. अद्यापही या पूरस्थितीतून लोक सावरलेले नाहीत. या सर्वांचे पंचनामे कृषी विभाग, तलाठी यांनी पूर्ण केले आहेत. शासनाने भरपाई मंजूर केली असून महिना उलटला तरी भरपाई मिळालेली नाही. कोकणात विशेषतः सिंधदुर्गात गणेश चतुर्थी उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. या उत्सवकाळात तरी शेतकऱयांना भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. श्री. मुसळे यांनी येत्या चार दिवसात भरपाई शेतकऱयांच्या खात्यात जमा केली जाईल, असे स्पष्ट केले.