मुंबई \ ऑनलाईन टीम
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान झाले. भविष्यात पूर येऊ नये यासाठी पुराचा धोका असलेल्या नद्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या गाव आणि शहरांच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंत हा उपाय नाही, असे सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने काय ठरवले याची मला काही कल्पना नाही. मात्र संरक्षक भिंत हा काही त्याच्यावरचा उपाय नाही. भिंत बांधली तरी त्याच्यावरून पाणी येणार. किंवा ते आऊटलँकिंग करणार, कारण या पाण्याचा वेग आणि दाब अधिक असेल. जे पाणी पावसाचं नाही. आपण पाऊस वाढल्यानंतर जेव्हा धरणाचा विसर्ग करतो तेव्हा चारही बाजूंनी पाणी एकत्र येतं.
आपण एखाद्या ठिकाणी भिंत बांधून त्याचा फायदा होईल. मात्र यापेक्षा आमच्या सरकारच्या काळात निर्णय घेतल्याप्रमाणे डायव्हर्जन कॅनॉल तयार करून पुराचा धोका असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवता येईल. त्यासंदर्भात वर्ल्ड बँकेशी आपण चर्चा केली होती. त्याला तत्त्वता मान्यताही मिळाली होती. तो प्रकल्प सरकारने पुढे नेल्यास अधिक फायदेशीर होईल, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.