जीव झाला येडापिसा मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. जीव झाला येडापिसा मालिकेला पहिल्या भागापासून प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. गावातील रांगडा गडी शिवा म्हणजेच अशोक फळ देसाई, सिद्धी म्हणजेच विदुला चौघुले यांनी त्यांच्या पहिल्याच मालिकेमध्ये प्रेक्षकांना आपलेसे केले तसेच आत्याबाई म्हणजेच चिन्मयी सुमित, जलवा, मंगल यांच्या भूमिकांना सगळ्यांचीच पसंती मिळाली. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाला सुरुवात झाली.
शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले. मालिका आता रंजक वळणावर पोहचली असून, येत्या 21 जुलैपासून मालिकांचे नवे भाग रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जीव झाला येडापिसा मालिकेचे नवे भाग सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. मालिकांच्या कलाकारांमध्ये, आणि संपूर्ण टिममध्येच एक वेगळ्याप्रकारचा उत्साह, उमेद होती. तब्बल तीन महिन्यानंतर शूटिंग सुरू झाल्याने सगळेच खूप आनंदी आहेत. शूटिंगचे वातावरण, एकत्र जेवण, गप्पा, सीनच्या वेळेसची रिहर्सल आम्ही सगळ्यांनीच खूप मिस केली. त्यामुळे पहिल्या दिवशी सेटवर आलो शूटिंग सुरू झाले. ऍक्शन – कट हे शब्द बऱयाच दिवसांनी कानावर पडले त्यावेळी खूप भरून आले. असं वाटल पॅकअप होऊच नये. तो खूप वेगळाच क्षण होता, एक वेगळीच भावना होती. असे सिध्दीची भूमिका साकारणारी विदुला चौघुले म्हणाली.
जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सिध्दी आणि शिवाचं प्रेम दिवसागणिक फुलू लागले. या दोघांमधले प्रेमळ क्षण पाहण्याची आतुरता प्रेक्षकांना होती आणि ते आता मालिकेमध्ये बघायला मिळाले. शिवा आणि सिद्धीच्या नात्यात आता प्रेमाचा ओलावा येऊ लागला. गैरसमज आणि वाद विसरून एकमेकांचा हात घट्ट धरून त्यांनी सुखी संसाराची वाटचाल सुरू केली. यामध्ये एकमेकांना खुश ठेवण्याचा ते खूप प्रयत्न देखील करत आहेत. आत्याबाईंनी सोनी आणि सरकारच्या लग्नाचा प्रस्ताव पुन्हाएकदा लष्करे कुटुंबासमोर मांडला. आत्याबाईंच्या निर्णयाला पहिल्यांदा शिवाने नकार दिला आणि त्यामुळे मंगल आणि आत्याबाई दोघांवर नाराज आहेत. सिध्दीमुळे हे घडले आहे, सिद्धी याला जबाबदार आहे आणि त्यामुळे आता मंगल नवीन कुठली खेळी खेळणार, सासू – सुनेच्या या भांडणात शिवा सिध्दीला कसे सांभाळून घेईल, सिद्धीö शिवाच्या नात्यात आलेला गोडवा आत्याबाईंमुळे हिरावून तर जाणार नाही ना? मंगलमुळे या दोघांमध्ये दुरावा येईल ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या भागांमध्ये मिळणार आहेत.