कणकवलीत तीन दिवसात 24 पॉझिटिव्ह
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणीच नाही!
प्रतिनिधी / कणकवली:
तालुक्यात सोमवारी रात्रीपासून आणखी 24 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत असतानाच सर्व व्यवहार बिनधास्तपणे सुरू आहेत. जिल्हय़ाच्या चेकपोस्टवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली, तरीही रेल्वेने येणाऱयांची कोणतीही तपासणी केली जात नसल्याचे पुढे आले आहे. दुसरीकडे या साऱयावर कहर म्हणजे तालुक्यातील एका गावातून उपचारासाठी पाठविलेल्या एका रुग्णाला तिसऱया दिवशी वाहन न देता थेट एसटीने घरी पाठवून देण्यात धक्कादायक प्रकारही पुढे आला आहे.
सोमवारी रात्रीपासून तालुक्यात 24 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात कणकवली शहरातील तब्बल 13 जणांचा समावेश आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत असताना सर्व व्यवहार नियमितपणे सुरू आहेत. आठवडा बाजारही मंगळवारी नियमितपणे पार पडला. गावोगावी विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात येत आहेत. या साऱयावर कोणतीही बंधने नसल्याचे दिसून येत असून कोरोनाचा संसर्ग वाढण्यास प्रशासनाची ढिलाई कारणीभूत ठरत असल्याचे दिसते.
तालुक्यात मंगळवारी पॉझिटिव्ह सापडलेल्यांमध्ये कणकवली शहरातील तेराजणांसोबतच तळवडे, वरवडे-फणसनगर, जानवली, तळेरे येथील प्रत्येकी एक, तर वाघेरी येथील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 149 झाली आहे.
रेल्वे प्रवाशांची तपासणीच नाही
दरम्यान, जिल्हय़ाच्या प्रवेशद्वारांवर जरी आरोग्य पथके तैनात ठेवण्यात आली असली, तरीही रेल्वे स्टेशनवरून येणारे चाकरमानी बिनधास्त येत आहेत. रेल्वे स्टेशनवर येणाऱयांच्या तपासणीसाठी कोणतीही व्यवस्था नाही. रेल्वेच्या माध्यमातून येणाऱयांची संख्या मोठी असतानाही तेथे व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. एकीकडे सीमेवर नाकाबंदी करून तपासणी करताना दुसरीकडे रेल्वेने आलेल्यांसाठी मुभा देण्याच्या धोरणाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एसटीने जाण्यास कशी दिली मुभा?
दुसरीकडे तालुक्यातील एका गावामधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला उपचारासाठी ओरोस येथे पाठविण्यात आले होते. तेथे तीन दिवस उपचार केल्यानंतर त्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले. मात्र, वाहन उपलब्ध नसल्याने त्यांना अन्य वाहनाने जाण्यास सांगण्यात आले. परंतु, पॉझिटिव्ह येऊन तीन दिवस झाले असल्याने त्यांना कुणी घेत नव्हते. अखेर त्यांना एसटीने जाण्यास सांगण्यात आले व ते ओरोसहून एसटीने कणकवलीपर्यंत आले. तेथून अन्य वाहनाने गावी नेण्याची त्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या या कार्यपद्धतीबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.