प्रतिनिधी / सातारा :
मागच्या सरकारच्या तुलनेत आताच्या सरकारमध्ये महिलांवरील अत्याचारचे प्रमाण कमी आहे. तब्बल 5 हजार 190 केसेस मागच्या सरकारमध्ये जास्त होत्या. महिलांवर अत्याचार झाल्याच्या ज्या दिवशी सकृतदर्शनी तक्रारी दाखल होतात. त्याच दिवशी संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आमचं पोलीस खातं कुठेही कमी पडत नाही. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ या अपुऱ्या महितीच्या आधारे राजकीय हेतूने बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. दरम्यान, जो नियमाचा भंग करेल त्याला पोलिसी खाक्या दाखवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. देसाई म्हणाले, काल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पोलीस दलावर व माझ्यावर टीका केली. त्यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे आणि अपूऱ्या माहितीवर केलेले आहे. दुर्दैवाने जिल्ह्यात चार-पाच प्रकार घडले. त्या सर्व प्रकारामध्ये ज्या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली, त्याच दिवशी संशयिताला अटक केलेले आहे. केवळ गटशिक्षणाधिकाऱ्यांना अटक करायला पाच ते सहा दिवस लागले होते.
दरम्यान, महाबळेश्वर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन मुख्य संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना मदत करणाऱ्या पाच संशयितांना अटक केली आहे. दत्तक विधान केल्याचे आमच्या पोलिसांनी शोधून काढले असून संशयितांच्या शोधासाठी एलसीपी आणि स्थानिक पोलिसांचे पथके रवाना झालेली आहेत. चाफळ येथील अल्पवयीन युवतीच्या चाकु हल्ला प्रकरणात संशयितास अटक केली आहे. ज्या तांबव्याच्या प्रकरणाबाबत चित्रा वाघ बोलल्या. त्यांच्याच पालकांनी कालच सांगितले की, पोलीस गृहराज्यमंत्र्यांमुळे चांगले सहकार्य करत आहेत. असे असताना अपूऱ्या माहितीच्या आधारावर केवळ राजकिय हेतूने बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे आहे, असेही देसाई म्हणाले.