गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांचे मत
जय नाईक/ पणजी
प्रसंगी दुश्मनालासुद्धा आपला बनविणे हेच भाजपचे संघटनकौशल्य आहे आणि त्याच मुशीतून घडलेल्या कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही आत्मविश्वासाने मतदारांसमोर जात असतो. आमच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही फायनलच असते आणि प्रत्येक मतदार हा महत्वाचा असतो. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त पटीने आमच्या उमेदवारांनी यश प्राप्त केले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अफाट कार्यकतृत्व आणि स्वच्छ प्रतीमा यांचाही आम्हाला मोठा फायदा होत असतो, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केले.
तरुण भारतला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. आम्ही केवळ निवडणुकीपुरते मतदारांना जवळ करणाऱयांपैकी नव्हेत. कोरोना महासंकटामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे अन्य पक्षांचे आमदार, कार्यकर्ते घरी बसून केवळ पत्रके काढत होते, किंवा पत्रकार परिषदा घेऊन अस्तित्व दाखवत होते, अशा भयभीत काळातसुद्धा आमचे मुख्यमंत्री, अन्य मंत्री, आमदार, कार्यकर्ते आणि जिल्हा पंचायतीचे उमेदवार हे सक्रीय होते. सामान्यातील सामान्य जनतेच्या दारापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी, गरजा ओळखून सर्वतोपरी मदत करत होते. त्याच भरवशावर दोन्ही जिल्हा पंचायतीत विजयाची खात्री आम्ही व्यक्त केली होती. ती सत्यात उतरली व प्रचंड मताधिक्क्यांनी आमचा विजय झाला.
पक्ष संघटनेचे कार्य, सरकारच्या कार्यास पसंती
दरम्यानच्या काळात आम्ही संघटनात्मक बांधणी करण्यावर भर दिला. मंडळ, जिल्हा, राज्य, मोर्चा आदी सर्व कार्यकारिणीना सक्रीय केल्या. एकसंघपणे काम प्रारंभ केले. कार्यकर्त्यांच्या सतत संपर्कात राहू लागलो, तसेच दुसऱया बाजूने सरकारचे कामही लोकांच्या पसंतीस उतरत होते. त्याचाही सकारात्मक परिणाम दिसून आला. अन्य राज्याच्या तुलनेत गोव्यात कोरोनाकाळात सरकारने अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक कार्य केले आहे. कोरोनाग्रस्तांना 100 टक्के मोफत उपचार, खाणöजेवण देण्यात आले. कोरोना हा संपूर्ण जगासाठीच एक नवा अनुभव होता. त्यामुळे आम्हीही त्यात कुठेतरी कमी पडलो असू शकतो, परंतु त्याही परिस्थितीत अत्यंत चांगले काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला, असे तानावडे म्हणाले.
विरोधक, एनजीओंनी फक्त बदनामीचेच काम केले
विरोधक, एनजीओ यांनी कोळसा, डबल ट्रेकिंग, राष्ट्रीय महामार्ग, तामनार वीज प्रकल्प, आयआयटी, म्हादई, यासारखे विषय घेऊन आंदोलने उभी करून वातावरण गढूळ करणे, लोकांना फसविणे, दिशाभूल करणे, त्यांच्यात चलबिचल निर्माण करणे, सरकारची बदनामी करणे, एवढीच कामे केली. परंतु आजचे मतदार सुशिक्षित आहेत. त्यांना बरे-वाईट याची पूर्ण जाण आहे, अभ्यास आहे. त्याशिवाय आंदोलने करणाऱया या लोकांना भाजपबद्दल कधीही आपुलकी नव्हती व ते भाजपचे मतदारही नव्हते. त्यामुळेच मोले, चांदोर, गिरदोळी, मेळावली आदी ठिकाणी जेथे जेथे जास्त विरोध होता त्या सर्व भागात आमचेच उमेदवार विजयी झाले. विरोधकांसाठी ही सणसणीत चपराक ठरली आहे, असे तानावडे म्हणाले.
कोळसा हाताळणीस आमचाही विरोधच आहे
अदानी, जिंदाल यांना गोव्याची वाट काँग्रेसनेच दाखविली आणि आता तेच त्यांच्या विरोधात झेंडे घेऊन उभे राहतात. यावरून काँग्रेसचा खरा चेहरा लोकांना दिसून आला. कोळशामुळे सर्वाधिक प्रदूषण हे मुरगाव तालुक्यात होते आणि या तालुक्यातील चारही आमदार भाजपचे आहेत. त्यांना पुन्हा निवडून यायचे असेल तर लोकांचा विरोध पत्करून चालणार नाही याची पक्षाला जाणीव आहे. त्यामुळे आमचाही कोळशाला विरोध आहे आणि ते मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेले आहे, असे एका प्रश्नावर तानावडे यांनी सांगितले.
मतदान कमी होण्यास विरोधकच जबाबदार
जि. पं. निवडणुकीत सुमारे 44 टक्के मतदार बाहेर पडले नाहीत यामागील कारण काय? असे विचारले असता, मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणे हे कार्यकर्त्यांचे काम. आमच्या कार्यकर्त्यांनी ते चोख बजावले. त्यामुळेच केरी, पाळी यासारख्या काही मतदारसंघात आम्हाला सर्वाधिक आघाडी मिळवून देणारे मतदान झाले. तसे पाहता हे मतदान एकतर्फीच झाले, असे म्हटले तरी चूक ठरणार नाही. कारण विरोधी उमेदवार मतदारांना बाहेर काढण्यात कमी पडले. टक्केवारी कमी होण्याचे हेही एक कारण असू शकते, असे तानावडे म्हणाले.
मांद्रेतील हरमल व मोरजी दोन्ही मतदारसंघ हे एकमेकांवर अवलंबून होते. हरमलमध्ये कोरगावचाही समावेश होतो. कोरगाव हा भाग पेडणे मतदारसंघात येतो. सर्वाधिक मते कोरगावात आहेत. त्यातून स्वतःच्या गावचा उमेदवार असताना बाहेरील उमेदवारास मते का द्यावी, असा विषय असल्याने तेथील अपक्ष उमेदवारास स्थानिक सर्व पंचसदस्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आमचा उमेदवार तेथे कमी पडला.
पालिका निवडणुकीतही जिपंच्या धर्तीवर काम करणार
लवकरच पालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतसुद्धा आम्ही जि. पं. च्या धर्तीवरच काम करणार आहोत. फरक एवढाच असतो की विधानसभा व जि. पं. निवडणूक पक्षीय पातळीवर होतात. पालिका आणि पंचायतीच्या निवडणुका उमेदवार स्वबळावर लढवितात. परंतु काहीही असले तरी जिंकणे हे एकच ध्येय ठेऊन आम्ही काम करणार आहोत, असे तानावडे यांनी स्पष्ट केले.
आमदारांच्या कार्याचा आढावा, जिंकण्याची क्षमता पाहणार
वर्षभरानंतर विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. त्यावेळी विद्यमान सर्व आमदारांना उमेदवारी देण्यात येणार आहे का? असे विचारता, त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, त्यापूर्वी प्रत्येक आमदाराच्या कार्याचा आढावा व जिंकण्याची क्षमता यांचा पूर्ण अभ्यास, आढावा घेण्यात येईल व शेवटच्या दोन-तीन महिन्यात ते जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले.
जिल्हा पंचायत निवडणुकीतून मोठा धडा म्हणा किंवा अनुभव मिळाला तो म्हणजे आम्ही सातत्याने लोकांमध्ये राहीले पाहिजे. लोकांच्या आशा आकांक्षा यांची पूर्तता केली पाहिजे, त्यांचे प्रश्न, समस्या सोडविल्या पाहिजे. काही प्रसंगी मतदारांशी केवळ सुसंवाद साधला तरीही पुरेसे होते. त्यांच्यापासून दूर राहणे किंवा केवळ निवडणुकीच्या वेळी आणि मतदानापुरतेच त्यांच्याकडे जाणे ही स्वार्थी प्रवृत्ती टाळली पाहिजे. तरच मतदार तुम्हाला जवळ करतात. हे काम संघटीतपणे झाले पाहिजे. मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात कार्यकर्त्यांची भूमिका फार महत्वाची व जबाबदारीची ठरते. भाजपाकडून हे काम नियमित होत असते. म्हणूनच मतदार सतत आमच्या मागे आहेत, असेही श्री. तानावडे यांनी अन्य एका प्रश्नावर स्पष्ट केले.
बहिष्कारातून काहीच साध्य होत नाही
मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकणे हे पूर्णपणे चुकीचे. जि. पं. निवडणुकीत दोन ठिकाणी असे प्रकार घडले. परंतु त्याद्वारे त्यांनी स्वतःच्या मतदानाच्या अधिकाराचीच पायमल्ली केल्यासारखे होते. मतदारांचा एखादा विषय, प्रश्न, समस्या असेल तर ते चर्चेद्वारे सोडविता येतात. बहिष्कारातून काहीच साध्य होत नाही. तरीही त्यांनी बहिष्कार घातला म्हणून आम्ही त्यांना बहिष्कृत करणार नाही. त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे प्रयत्न होतील. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्षही घातलेले आहे व त्यांना तसे आश्वासनही दिले आहे, असे तानावडे यांनी सांगितले.
जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर आता त्यांचे अध्यक्ष कधी निवडण्यात येणार? असे विचारता, त्यासंदर्भात पुढील एक दोन दिवसात निर्णय होईल, असे श्री. तानावडे यांनी स्पष्ट केले.
’आम आदमी पक्ष’ या दिल्लीस्थित पक्षाला भाजपनेच गोव्यात आणले, असा आरोप बहुतेक सर्वच विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. त्याबद्दल विचारले असता, आरोप करणे हे विरोधकांचे कामच असते. सत्ताधारी पक्षाला विविध आरोपांचा सामना करावाच लागतो. परंतु आपला प्रत्यक्षात कुणी आणले याबद्दल आमच्यापेक्षा काँग्रेसला जास्त माहिती असेल. दुसऱयांवर आरोप करत बसण्यापेक्षा पक्षसंघटन बांधणीवर भर दिला असता तर काँग्रेसला आजच्या दैनावस्थेला सामोरे जावे लागले नसते, असेही श्री. तानावडे यांनी सांगितले.