कोल्हापूर सर्वपक्षीय, हद्दवाढ कृती व समन्वय समितीची मागणी
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिका अस्तित्वात येवून 75 वर्षे झाली. मात्र आतापर्यंत एकदाही महापालिकेची हद्दवाढ झाली नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे.यामुळे प्रथम हद्दवाढ करावी आणि त्यानंतरच निवडणूक घ्यावी,अंतिम प्रभाग रचना स्थगित करावी असा प्रस्ताव महापालिकेने शासनाला पाठवावा अशी मागणी कोल्हापूर सर्वपक्षीय, हद्दवाढ कृती व समन्वय समितीने प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.महापालिकेत समितीने प्रशासक बलकवडे यांची भेट घेऊन चर्चा केली.
माजी महापौर आर.के.पोवार,सुनिल कदम,ऍड बाबा इंदूलकर,आपचे संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी प्रशासक कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. यावेळी बाबा इंदूलकर यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची गरज विशद केली. शहरात 1854 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाली.अनेक स्थित्यंतरानंतर 1972 साली महापालिका अस्तित्वात आली. 1946 मध्ये शहराचे क्षेत्र 66.82 किलोमीटर इतके झाले. पण त्यानंतर आजपर्यंत हद्दवाढ झाली नाही. पण त्याचवेळी लोकसंख्येत भरमसाठ वाढ झाली आहे.
दरम्यान,कोल्हापूर महापालिकेची निवडणूक एप्रिल 2022 मध्ये होण्याची चर्चा असून त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. महापालिकेच्या निवडणूकीबरोबर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. परंतु, हद्दवाढ न करता महापालिकेची निवडणूक घेतली गेली तर हेच कारण भविष्यात पुढे करुन हद्दवाढ पुन्हा रोखली जाईल.यामुळे प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्दीकरणाचा कार्यक्रम पार पडला असला तरी जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन अंतिम प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी केली. प्रशासनाने याबाबत भविष्यात होणारा उद्रेक शासन व निवडणूक आयोगाला कळवावा.तसे न झाल्यास हद्दवाढी नागरिकांना रस्त्यावर उतरुन टोकाची लढाई लढावी लागेल असा इशारा दिला. यावेळी दुर्गेश लिंग्रस,किशोर घाटगे,अनिल घाटगे,विवेक कोरडे,बाबा पार्टे,सुभाष देसाई,संजय घाटगे-वंदूरकर,महादेव केसरकर,प्रतीकसिंह काटकर,नितीन पाटील यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.