प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 30 रिक्षांचे वितरण
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरात फिरणाऱया वाहनांमुळे प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर 49 प्रवासी ई-रिक्षांचे वितरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. यापैकी 30 रिक्षांचे वितरण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. त्यामुळे आता शहरातील रस्त्यांवर प्रवासी ई-रिक्षा धावणार आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्मार्ट रस्ते, स्मार्ट बसस्थानके, स्मार्ट बसथांबे, सायकल ट्रक, उद्यानांचा विकास असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी तसेच बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या हेतूने प्रवासी ई-रिक्षा वितरण करण्यात आल्या. स्मार्ट प्रवासी ई-रिक्षा वितरण करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बेरोजगारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यामधून 49 लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. प्रवासी ई-रिक्षा खरेदीसाठी स्मार्ट सिटी कंपनीकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे. एका प्रवासी ई-रिक्षाची किंमत 1 लाख 95 हजार रुपये असून यापैकी 45 हजार रुपये लाभार्थींनी जमा करण्याची अट होती. उर्वरित रक्कम स्मार्ट सिटीने जमा केली आहे. 49 पैकी 30 रिक्षा नुकत्याच दाखल झाल्या असून, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दि. 26 जानेवारी रोजी वितरित करण्यात आल्या. उर्वरित 19 प्रवासी ई-रिक्षा वितरित करण्यासाठी कंपनीला ऑर्डर देण्यात आली आहे. या लाभार्थीनादेखील लवकरच प्रवासी ई-रिक्षा मिळणार आहेत.
सदर प्रवासी ई-रिक्षा बॅटरीवर चालणाऱया आहेत. ही ध्वनी व प्रदूषणविरहीत वाहने असून, शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. खर्चाचे प्रमाणही कमी होणार असून, प्रवासी आणि रिक्षाचालकांना परवडणारे असल्याने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तरतूद
आतापर्यंत 49 पैकी 30 रिक्षा लाभार्थींना प्रजासत्ताक दिनानिमित्त वितरित करण्यात आल्या असून, उर्वरित 19 लाभार्थींनाही रिक्षा देण्यात येणार आहेत. याकरिता वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. शहरातील प्रदूषण कमी होण्यासाठी या रिक्षा फायदेशीर असल्याने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रवासी ई-रिक्षा देण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक शशीधर कुरेर यांनी दिली.