प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथ विक्रेत्यांना 10 हजार रुपयांपर्यंत पतपुरवठा करण्यात येणार आहे. शहरात आतापर्यंत 350 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून 82 फेरीवाल्यांना कर्ज वितरीत करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स कमिटीची बैठक झाली. बैठकीस जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी प्रवीण पोवार, नागरी बँकेचे अनिल नगराळे, सुधीर कदम, संदीप बांधव, महालक्ष्मी बँकेचे समीर ढेकरे, NULM चे व्यवस्थापक रोहित सोनुले, विजय तळेकर, समुदाय संघटक स्वाती शहा, अंजनी सौंदलगेकर आदी उपस्थित होते. तर या समितीचे सदस्य आर. के. पोवार, दिलीप पोवार आणि नंदकुमार वळंजू हे ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते.
कोरोना संकट काळात पथ विक्रेत्यांचा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांना प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पीएम स्वनिधी पोर्टलवर 1 हजार 128 फेरीवाल्यांनी कर्जासाठी अर्ज केले आहेत. अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेचे प्रतिनिधी यांनी पुढील चार दिवसात त्यांचेकडे दाखल कर्ज प्रकरणाची सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशा सूचना आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी केल्या. पथ विक्रेता सर्वेक्षण पासून वंचित राहिलेले फेरीवाले आणि 24 मार्च 2020 पूर्वी पासून व्यवसाय करणाऱया फेरीवाल्यांनी pmsvanidhi ऑनलाईन पोर्टल वर “APPLY FOR LOR”वर जाऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कलशेट्टी यांनी केले.