विनोद सावंत/ कोल्हापूर
राज्य निवडणूक आयोगाने कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार कच्चा आराखडा करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी त्यांनी कडक नियमावली केली आहे. त्यामुळे महापालिकेला सर्व प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. एक सदस्यीय प्रभागरचना करतानाच महापालिका कर्मचाऱयांची दमछाक झाली होती. आता तर त्रिसदस्यीय प्रभाग रचना आहे. जुन्या तीन प्रभागाच्या मिळून एक वॉर्ड होणार आहे. त्याच्या सीमा निश्चित करणे, अचूक मतदारयादी करणे अशी कामे कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखीची ठरणार आहेत.
महानगरपालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार 27 वॉर्ड आणि 81 नगरसेवक होणार आहेत. महानगरपालिकेकडून प्रभागरचनेचा कच्चा आराखडा करण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये जुन्या तीन प्रभागांचा मिळून 18 हजार मतदारांचा एक वॉर्ड असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कडक नियमावलीनुसार वॉर्ड करताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येणार आहे. निवडणुकीसाठी पुन्हा श्रीगणेशा कग्नरावी लागणार असल्याने कर्मचाऱयांची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे काहींनी निवडणुकीच्या कामाची धास्तीच घेतली आहे.
त्रुटीविरहित रचना करणे आव्हान
एक प्रभाग रचनेनुसार प्रारूप मतदारयादी करताना ढिगभर चुका झाल्या होत्या. शहरातील मतदारांची नावे उपनगरातील प्रभागांत गेली होती. त्यामुळे 900 पेक्षा जास्त हरकती आल्या होत्या. नव्याने यंत्रणा लावून `घर टू घर’ तपासणी करून त्रुटी दूर करून अंतिम मतदारयादी केली होती. केलेले हे सर्व कष्ट वाया गेले आहे. आता तीन प्रभागांचा एक वॉर्ड असणार आहे. यामध्ये त्रुटीविरहित प्रभाग रचना आणि मतदारयादी तयार करणे महापालिका कर्मचाऱ्यांसमोर आव्हान आहे.
अतिरिक्त कामातून सुटका केव्हा होणार?
तीन वर्षापासून महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी कामात व्यस्त आहेत. अतिरिक्त कामाचा बोजा त्यांच्यावर पडत आहे. परिणामी, मुळ कामावर परिणाम होत आहे. यामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत उपाययोजना, एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुकीचे कामकाज, महापुरावेळी उपाययोजना, पुरातील नुकसानीचे पंचनामे, कोरोनाच्या दुसऱया लाटेत उपाययोजना अशी एकामागोमाग एक कामे लागत गेली. आता त्रिसदस्यीय प्रभागरचनेचे काम त्यांना करावे लागत आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावली
-प्रभाग रचना करताना गोपनीयता पाळणे, नियमांचे काटेकोर पालन करावे.
–प्रगणक गट करताना शहरातील कोणतेही क्षेत्र राहू नये.
-प्रभागरचनेची सुरवात उत्तरेकडून पूर्व दिशेकडे घेऊन पश्चिमेकडे प्रभाग करत सरकावे. शेवट दक्षिणेत करावा. प्रभागाचे क्रमांक त्याच पद्धतीने देण्यात यावे.
-प्रभागाच्या सीमारेषा मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, रस्ते, फ्लायओव्हर अशा नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावी.