वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
कोरोना विषाणूविरोधी लस बनवण्यासाठी भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वेगाने काम सुरू आहे. अनेक देशांच्या आणि कंपन्यांच्या चाचण्या प्रगतीपथावर असल्या तरी प्रभावी लस तयार करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत केला. भारतात कोरोना विषाणूच्या लसीबद्दल लवकरच चांगली बातमी मिळू शकते. भारतही इतर देशांप्रमाणेच लस बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या काळात लस भारतात उपलब्ध होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे ते पुढे म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून राज्य व केंद्र सरकार कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण देश कोरोनाची लढाई लढत आहे. 7 जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याची बातमी मिळाली होती. आम्ही 8 जानेवारीपासून बैठक सुरू करून लढय़ाची तयारी सुरू केली होती. कोरोनाबाबत राज्यांच्या सहकार्याने केंद्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे आपली परिस्थिती उर्वरित जगाच्या तुलनेत चांगली आहे. 135 कोटींच्या या देशात आपण दररोज 11 लाख चाचण्या घेत आहोत. आपल्यापेक्षा जास्त एकूण 5 कोटी चाचण्या अमेरिकेने आतापर्यंत केल्या आहेत. आपण लवकरच चाचण्यांमध्ये अमेरिकेला मागे टाकू, असे ते म्हणाले. राज्यसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर दिले. 8 जानेवारीपासून पंतप्रधान आणि राज्यांचे आरोग्यमंत्री या परिस्थितीला तोंड देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मुख्यमंत्री ही लढाई लढत आहेत. देशात 30 जानेवारीला पहिला रुग्ण आढळल्याच्या आधीच सर्व सूचना आणि माहिती राज्यांना देण्यात आली होती. पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते, असे आरोग्यमंत्री म्हणाले.