अध्याय बाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा विद्वानांनी सांगितलेल्या तत्त्वांची संख्या निरनिराळी कशी असे तू विचारले होतेस त्याचे कारण म्हणजे तत्त्वे एकापासून एक उत्पन्न होतात ह्याला परस्परांचा ‘अनुप्रवेश’ म्हणतात. तत्त्वांची संख्या ही अशी वाढत जाते. जेव्हढी उपतत्वे जास्त तेव्हढी तत्वांची संख्या जास्त असते. ह्यात तत्वविचार सांगणाऱयाची जशी इच्छा असते, त्याप्रमाणे त्या तत्त्वांची संख्या होते. कार्य व कारण एकच असे जे मानतात, त्यांची तत्त्वसंख्या थोडी होते. तत्व व उपतत्व एकच मानले तर तत्वांची संख्या कमी होते ज्याचे जसे ज्ञान असते, ज्याला ज्या मताचा अभिमान असतो, त्या त्याप्रमाणे तो बोलत असतो. आता उद्धवा! ऋषींनी जी सव्वीस तत्त्वे निवडून काढून सांगितली आहेत, ती सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. प्रकृती, पुरुष, महत्तत्त्व, अहंकार, पंच महाभूते, अकरा इंद्रिये, मिळून पंचवीस तत्वे होतात. ईश्वराहून जीव भिन्न आहे असे समजून तो वेगळा काढला तर हीच तत्त्वं सव्वीस होतात. असे जरी असले तरी भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्म हे एकच तत्व आहे आणि त्याची प्राप्ती नामस्मरणाने होते. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचे मनोगत बरोबर जाणले होते किंबहुना ते स्वतः भगवंताचे चालतेबोलते रूप असल्याने त्यांनी भगवंतांच्या विचारांशी एकरूप होऊन अभंग रचना केली आहे. तो प्रसिद्ध अभंग असा आहे. एक तत्त्व नाम दृढ धरी मना । हरीसि करूणा येईल तूझी ।।1।। ते नाम सोपेरे राम कृष्ण गोविंद ।। वाचेसी सतत जपे आधी ।।2।। नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा, वाया आणिका पंथा जासी झणे ।।3।। माऊली म्हणतात, केवळ राम कृष्ण गोविंद हा सोपा जप दृढ श्रद्धेने सतत करत रहा म्हणजे हरिला तुझी करुणा येईल. यापेक्षा दुसरे कोणतेच तत्व नाही हे लक्षात घेऊन अन्य मार्ग चोखाळू नको. चुकून जरी अन्य मार्ग धरलास तर जन्म वाया गेला म्हणून समज पण संतांनी कितीही कानी कपाळी ओरडून सांगितले तरी मनुष्य काही शहाणा होत नाही कारण त्याच्या त्रिगुणयुक्त जिवात्म्यावर रज, तम गुणांचा असलेला पगडा त्याच्यातील सत्वगुणावर मात करतो आणि त्याला अनादिकालापासून चालत आलेल्या अविद्येने घेरून टाकतो. परिणामी ईश्वराचा अंश असलेल्या जिवात्म्याला ईश्वराचा विसर पडतो. मायेच्या आवरणाखाली असल्याने तो जीवनातील मोहमयी वस्तू, व्यक्ती व परिस्थिती यात गुंततो. हे सर्व अविद्येमुळे म्हणजे आत्मज्ञानाच्या अभावामुळे घडते. अविद्येमुळे तो देहाभिमानाला कवटाळून बसतो आणि कर्माचे बंधन दृढ होते. कर्तेपणाच्या अहंकाराने जीवात्मा उपदव्याप करीत असतो, यामुळे पापपुण्य येऊन माथ्यावर बसते. अशा पद्धतीने विषयाचा लोभ वाढता वाढता वाढत जाऊन आत्मस्वरूप विसरण्याला कारणीभूत होतो. पापपुण्याच्या बंधनात अडकल्यामुळे कर्मपाश तोडता येत नाहीत. म्हणून त्याच्या उद्धारासाठी ज्ञानदात्या सर्वज्ञ ईश्वराची गरज असते. इथं एक शंका मनात येणे सहज शक्मय आहे ती म्हणजे गुरूपासून जर ज्ञानप्राप्ती होते, तर ईश्वराचे आभार का मानायचे अथवा ईश्वराची गरज तरी काय?’ सरळ विचार केला तर प्रश्न बरोबरच वाटतो पण उद्धवा, ईश्वरकृपेशिवाय सद्गुरु भेटत नाही आणि समजा सद्गुरूची गाठ यदाकदाचित जरी पडली तरी, ईश्वरकृपेशिवाय त्याच्यावर भक्ति जडत नाही. थोडक्मयात ईश्वरंच सद्गगुरूंच्या रूपाने मार्गदर्शन करत असतात असं म्हणायला हरकत नाही. म्हणून सदगुरु हेच ईश्वरमूर्ती होत. विशेष म्हणजे ही गोष्ट वेदशास्त्रार्थालाही संमत आहे.
गुरूमध्ये आणि ईश्वरामध्ये फरक आहे असे जो म्हणेल तो बुडालाच म्हणून समजावे. तात्पर्य, ईश्वराच्या अनुग्रहानेच जीव ज्ञानसंपन्न होतो. उद्धवा साधकाला ईश्वराची गरज आणखी एका गोष्टीसाठी पडते ती म्हणजे जरी गुरुने ज्ञानाचे स्वरूप सांगितले तरी ते ईश्वराच्या कृपेशिवाय मनात ठसत नाही हे लक्षात ठेव. थोडक्मयात अविद्या दूर होण्यासाठी, अत्यावश्यक असलेला सद्गुरूंचा अनुग्रह ईश्वरी कृपेशीवाय होणे शक्मय नाही म्हणून साधकाने सदैव ईश्वरस्मरण करत रहावे.
क्रमशः