- ‘क्या कहना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये केले होते पदार्पण
ऑनलाईन टीम / मुंबई :
गुजरातचे लोकप्रिय अभिनेते अमित मिस्त्री यांचे निधन झाले आहे. आज (दि. 23) हृदयविकाराच्या झटक्यामुळे अमित मिस्त्री यांचे निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. अमित यांच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
अमित टीव्ही आणि बॉलिवूडमधील नामांकित अभिनेता होता. अमितने आपल्या करिअरची सुरुवात थिएटर पासून केली होती. त्यानंतर 2000 मध्ये ‘क्या कहना’ या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये त्यांनी प्रीती झिंटाच्या भावाची भूमिका केली होती. त्यानंतर यमला पगला दिवाना, शोर इन द सिटी, एक चालीस लास्ट लोकल या सारखे चित्रपट आणि शशश.. कोई है, तेनाली रामा, वो, सात फेरों की हेराफेरी, मॅडम सर यासारख्या मालिका आणि बंदिश बॅन्डिट्स या वेब सिरीजमध्ये देखील काम केले होते. लवकरच ते सैफ अली खानच्या मल्टीस्टारर फिल्म ‘भूत पोलीस’ यामध्ये दिसणार होते परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
दरम्यान, अमितचे मॅनेजर महर्षि देसाई यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले कि, मला धक्का बसला आहे. तो एकदम ठीक होता आणि त्याच्या घरी होता. तो ठणठणीत होता आणि त्याची आरोग्याशी संबंधित कोणतीही तक्रार नव्हती किंवा त्याला कोणतीही समस्या जाणवली नव्हती. नाश्ता केल्यानंतर अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात नेण्याइतका वेळही मिळाला नाही. त्यांच्यासारखा अभिनेता हरपणे हे मनोरंजन विश्वाचे मोठे नुकसान आहे.