वार्ताहर / आवळी बुद्रुक
आजपासून शिक्षक हजर होत असलेने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळांमधील क्वारंटाईन थांबवून यापुढे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन अथवा अन्य संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे अशी विनंती तहसीलदार मीना निंबाळकर यांना भेटून करण्यात आली. तसेच सर्व शाळा सॅनिटाईझ करुन घेण्यात याव्यात. ई पास उशिरा मिळालेल्या बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांची मुख्यालयी आल्यानंतरही होम क्वारंटाईन मुदत १५ जून नंतर संपत असल्याने त्यांना शाळेत हजर राहण्याबाबत सवलत मिळणेबाबत शिक्षण विभागाला शिफारस करण्यात यावी. शाळा सुरु झाल्यानंतर मुलांसाठी हँडवॉश, सॅनिटायझर व थर्मल स्कॅनर ग्रामपंचायतीच्या वतीने पुरविण्यात यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या.
तहसिलदार मीना निंबाळकर यांनी या मागण्यांबाबत तात्काळ संबंधीत यंत्रणांना कळवून अडचणी दूर करण्यात येतील अशी ग्वाही दिली . यावेळी पंचायत समिती सदस्य रवीश पाटील , माजी सभापती दिलीप कांबळे , पंचायत समिती सदस्य मोहन पाटील , शिवाजी पाटील सोळाकूरकर , संजयसिंह पाटील , रविंद्र पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.