ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी भागात रविवारी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने गाडीखाली चिरडल्याचा आरोप होत असून, या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 4 शेतकरी आणि 3 भाजप कार्यकर्ते आणि एका चालकाचा समावेश आहे. त्यामुळे लखीमपूरमधील वातावरण चांगलेच तापले असून, अनेक पक्षांचे नेते त्या दिशेने कूच करत आहेत. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज पहाटे पोलिसांनी त्यांना सीतापूरमधील हरगाव येथून त्यांना ताब्यात घेतले.
प्रियंका गांधी यांना ताब्यात घेताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा तसेच त्यांचे कपडे ओढल्याचा आरोप काँगेसने केला आहे. काँग्रेस नेते दीपेंद्र हुडा यांनाही यावेळी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, आम्ही हार मानणार नाही, आमचा लढा सुरूच ठेवणार असे काँग्रेसने म्हटले आहे.
दरम्यान, मी घराबाहेर पडून गुन्हा करत नाही. मला फक्त प्रभावित कुटुंबांना भेटून त्यांचे दु:ख समजून घ्यायचे आहे. आणि ही जर माझी चूक असेल, तर यूपी पोलिसांकडे तशी ऑर्डर, वॉरंट असायला हवे. ऑर्डर नसताना यूपी पोलीस मला का रोखतात, असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.