नेरसा-गवळीवाडा अर्भक प्रकरणाला वेगळेच वळण, अल्पवयीनांच्या प्रेमातून जन्म
प्रतिनिधी/ खानापूर
नेरसा-गवळीवाडा येथे प्लास्टिक पिशवीत घालून झाडाला टांगलेल्या अर्भकाच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. हे अर्भक कोणी टांगले? याबद्दल गेल्या दोन दिवसांपासून गवळीवाडा व खानापूरमध्ये अनेक तर्क-वितर्क व्यक्त होत होते. मात्र या अर्भकाला एका अल्पवयीन मुलीने जन्म दिल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गवळीवाडय़ातीलच एका युवकाचे तेथीलच एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. त्यातूनच त्याने या मुलीशी संबंध ठेवले. त्यातूनच हे अर्भक जन्माला आले. मात्र दोघेही अल्पवयीन असल्याने घरातील कर्त्यामंडळींनी ही जबाबदारी नाकारली आणि ती मुलगी प्रसूत झाल्यानंतर हे अर्भक उघडय़ावर ठेवण्यात आले.
ही गंभीर बाब नागरिकांच्या निदर्शनाला येताच त्यांनी महिला व बालकल्याण खाते आणि पोलिसांना कळविले. त्यांनी प्लास्टिक पिशवीत बाळ सापडल्याचे जाहीर करून खानापूर येथे प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्या बाळाला पुढील उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले.
आता या बाळाची जबाबदारी नेमकी कोण घेणार? हा प्रश्न निर्माण झाला असून बाळाला अनाथ म्हणून जाहीर करू नये आणि बाळ ज्यांचे आहे त्यांच्याकडे पोहोचावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते धडपड करत आहेत. याबाबत नेरसा येथील कार्यकर्ते संजय देसाई, रणजीत देसाई, अशोक देसाई, ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष योग्य तो तोडगा निघावा, यासाठी प्रयत्न करत आहेत.
कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय
अशा अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांची नोंद आशा कार्यकर्त्यांकडे नसते किंवा आम्हालाही तशी नोंद करता येत नाही. घरचे लोक अब्रूपोटी हे दडवून ठेवतात. परंतु बालक जर दगावले असते तर खुनाचा गुन्हा दाखल झाला असता. बाळ नको होते तर त्यांनी ते सरळ महिला व बालकल्याण खात्याकडे द्यायला हवे होते. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून बाळाला आधार केंद्रात पाठविले जाते. आता जिल्हा बाल केंद्राशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल.
– रामामूर्ती, खानापूर सीडीपीओ