एकांत ठरतोय आकांत, किमती ऐवजासह अबूचीही लूट, सभ्यतेची मर्यादा पाळणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
म्हैसूर येथील चामुंडी डोंगर परिसरात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे चार वर्षांपूर्वी मुत्यानट्टी परिसरात वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या गँगरेप प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली असली तरी एकांतासाठी आडोसा शोधणाऱया मित्र-मैत्रिणी, प्रेमीयुगुल यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
24 ऑगस्ट रोजी रात्री एका महाविद्यालयीन तरुणीवर चामुंडी डोंगर परिसरात सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणी म्हैसूर पोलिसांनी 87 तासांत तामिळनाडूतील पाच जणांना अटक केली. हे सर्वजण मजुरी करणारे आहेत. केवळ कर्नाटकातच नव्हे तर सध्या देशभरात हे प्रकरण गाजत आहे. याच प्रकरणासारखा धक्कादायक प्रकार चार वर्षांपूर्वी बेळगावात घडला होता.
के.जी.पासून पी.जी.पर्यंत बेळगाव येथे शिक्षणाची सोय आहे. उत्तम हवामान, इतर शहरांच्या तुलनेत असलेली स्वस्ताई, शिक्षणाची चांगली सोय यामुळे केवळ परराज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही शेकडो विद्यार्थी बेळगावला येतात. विकेंड किंवा कॉलेजला दांडी मारून मित्र-मैत्रिणी, प्रेमीयुगुल फिरण्यासाठी बेळगाव बाहेर जातात. त्यांना धमकावून लुटणाऱया टोळय़ा बेळगाव परिसरात कार्यरत आहेत. केवळ लूटच नव्हे तर तरुणींची अबू लुटण्याचेही प्रकार घडतात. बेअब्रू होण्याच्या भीतीने अशा प्रकारांबद्दल कोणीही तक्रार दाखल करण्यास पुढे येत नाहीत.
बेळगावपासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर असणाऱया राकसकोप, किणये रोड, बेळगुंदी रोड, वैजनाथ डोंगर, मुत्यानट्टी डोंगर, भुतरामहट्टीसह परिसरातील काही निर्जनस्थळी तरुण-तरुणी एकांत शोधत असतात. पंधरा वर्षांपूर्वी काकतीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक बसनगौडा हुलसगुंद यांनी वाटमारी करणाऱया गुन्हेगारांच्या एका टोळीला अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर पडली होती.
गुन्हेगारांच्या कबुलीमुळे पोलीस अधिकारीही चक्रावले होते. ‘साहेब, आम्ही झुडूपात लपून बसतो. एखादे जोडपे आडोशाला आले आणि त्यांचे चाळे सुरू झाले की आपण टपकत होतो. त्यानंतर त्यांचे कपडे ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील किमती ऐवज लुटत होतो. एखाद्या जोडप्यातील तरुणी सुंदर असल्यास मात्र आम्ही सर्वच मर्यादा ओलांडायचो’, असे सांगत तब्बल आठ ते दहा प्रकरणांची या टोळीने कबुली दिली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील एकाही प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली नव्हती. सध्याही अशीच परिस्थिती पाहायला मिळते.
20 फेब्रुवारी 2017 रोजी काकती पोलीस स्थानकात एका 17 वषीय तरुणीने फिर्याद दाखल केली. पाच दिवस आधी आपल्या मित्रासह ती मुत्यानट्टी परिसरात फिरायला गेली असता तिच्यावर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह सहा जणांना अटक केली होती. गुन्हेगारांना न्यायालयात शिक्षाही झाली आहे. प्रत्यक्षात 15 फेब्रुवारी रोजी सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. तब्बल पाच दिवस उशिरा पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
म्हैसूर येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी चामुंडी डोंगर परिसरात पोलिसांना गस्त वाढविण्याची सूचना केली आहे. बेळगाव परिसरातही निर्जन ठिकाणी गस्त वाढविण्याची गरज आहे. अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा शस्त्रांचा धाक दाखवत प्रसंगी बेअब्रू करण्याची धमकी देत लुटण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. अब्रूला घाबरून तक्रार देण्यास कोणीच पुढे येत नाहीत.
असे प्रकार टाळण्यासाठी निर्जन ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज आहे. याबरोबरच आडोसा शोधणाऱया मित्र-मैत्रिणी व प्रेमीयुगुलांनीही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण एकांताचे परिवर्तन आकांतात होण्याची भीती आहे. बेळगाव परिसरात पुन्हा संघटित गुन्हेगारीला सुरुवात झाली आहे. सशस्त्र टोळय़ांच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. व्यापारी, उद्योजकांबरोबरच विद्यार्थ्यांना धमकावून त्यांची लूट करण्यात येत आहे. असे प्रकार टाळण्यासाठी आपणाकडून सभ्यतेची मर्यादा ओलांडली जाणार नाही, याची प्रेमीजनांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
अशी होते लूट….
एखादे प्रेमीयुगुल किंवा मित्र-मैत्रीण एकांतात सापडले की गुन्हेगार प्रथम त्यांचे कपडे ताब्यात घेतात. अलीकडे तर त्यांचे एकत्र छायाचित्र टिपून कुटुंबीयांना पाठविण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरू आहेत. कॅम्प पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात यापूर्वी अशाच एका टोळीला अटक झाली आहे. रात्रीच्या वेळी युगुलांना गाठून मोबाईलवर त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. कुटुंबीयांचे मोबाईल क्रमांक घेऊन मोठी रक्कम मागितली जाते. ‘पैसे द्या नाही तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करतो’, असे धमकावून त्यांना लुटण्यात येते. काही वेळा प्रियकरासमोरच तरुणीवर अतिप्रसंग केला जातो. सीपीएड् मैदानाजवळील झुडूपात ही टोळी दबा धरून बसायची. या टोळीची मोठी दहशत होती. बेअब्रू होण्याच्या भीतीने कोणीच त्यांच्याबद्दल तक्रार केली नव्हती. मात्र, पापाचा घडा कधी तरी भरतोच या न्यायाने ही टोळी आपसुकच पोलिसांच्या जाळय़ात अडकली.
चन्नप्पाचीही आठवण
जुन्या पिढीतील लोकांना चन्नप्पा हे नाव चांगलेच आठवणीत असणार. एपीएमसी रोड, धामणे रंगी, क्लब रोड, सीपीएड् मैदान, रेसकोर्स परिसरात त्याचा वावर असायचा. 25 ते 30 वर्षांपूर्वी त्याच्यावर एपीएमसी, कॅम्प आदी शहरातील वेगवेगळय़ा पोलीस स्थानकात गुन्हेही दाखल झाले आहेत. वरील परिसरात पूर्वी म्हणावी तशी वर्दळ नसायची. त्यामुळे एकांत शोधण्यासाठी येणाऱया युगुलांना चन्नप्पा लुटत होता. आता अशा अनेक टोळय़ा कार्यरत आहेत. बेअब्रू होण्याच्या भीतीने कोणी तक्रार करत नाही. तक्रार दाखल झाली नाही म्हणून पोलीस यंत्रणा तपास करीत नाही, अशी परिस्थिती आहे.