कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्यात तीन मंत्री झाले पण दुसऱ्या महिन्यापासून कोरोना संकट आले. त्यामुळे त्याच्याशी सामना करताना अनेक विकासकामांवर त्याचा परिणाम झाला. राज्यातील 23 लाख शेतकऱयांना 30 हजार कोटींची कर्जमाफी केली आहे. मात्र प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱया शेतकऱयांना द्यावयाचे 50 हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान अजून दिलेले नाही. मात्र उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार याबाबत लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शरद पवार यांना लिहीलेल्या पत्राबद्दल बोलताना ते म्हणाले, कृषीपंप वीज तोडणी, प्रोत्साहन अनुदान, वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाबाबत माजी खासदार शेट्टी यांनी पवार यांना पत्र दिले आहे. मात्र यापुर्वीच वीजेबाबत राज्यशासनाने अभय योजना आणली होती. चालू वीज बील भरले तर वीज तोडणार नाही, असा निर्णयही राज्यशासनाने घेतला होता. चालू वीज बील भरून सहकार्य करावे अशी माझी चर्चाही त्यांच्यासोबत झाली होती. उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. आता याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन त्यावर मार्ग निघावा अशी अपेक्षा आहे.
राजू शेट्टींनी आंदोलनाबाबत फेरविचार करावा
ते म्हणाले, राज्यातील शेतकऱयांची 60 हजार कोटी रूपयांची विजेची थकबाकी आहे. केंद्र सरकार अटींची पुर्तता होत नसल्याने वीज महामंडळाला कर्ज द्यायला तयार नाहीत. त्यामुळे पैसे वसूल झाले नाहीत, तर राज्य अंधारात जाईल अशी भीती ऊर्जा मंत्र्यानी व्यक्त केली आहे. त्यामुळे माझी शेट्टी यांना विनंती आहे की त्यांनी आंदोलनाबाबत फेरविचार करावा. उर्जामंत्र्यांशी आपण त्यांची बैठक लावण्यासाठी पुढाकार घेतो. फक्त स्वाभिमानीच नाही तर आघाडीतील इतर घटकपक्षांना निर्णय प्रक्रीयेत सामावून घेतले जात नसल्याच्या शेट्टी यांच्या आरोपाबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, हा प्रश्न माझ्या आखत्यारीतील नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमचे नेते शरद पवार, अजित दादा पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे यावर निर्णय घेतील. ही गोष्ट मी त्यांच्या कानावर घालेन, घटक पक्षांना सामावून घेण्याबाबत आपण ही विचारणा करू.
मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात, त्यामुळे सरकारला मर्यादा
10 मार्चला सरकार पडेल असे चंद्रकांतदादा पाटील सांगत आहेत याबाबत विचारता दादांनी पाच राज्यातील निकालानंतर सरकार पडेल असे म्हंटले आहे. त्याचा काय संबंध आहे, हे कळत नाही. पण 145 ची जुळणी झाल्याशिवाय सरकार पडत नाही. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टीकेल याची खात्री आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्याशी माझे अलिकडे बोलणे झाले नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायायलायत आहे. त्यामुळे काही मर्यादा आहेत. पुन्हा उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या सोबत बसून चर्चा करता येईल असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.