क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी नॉर्थईस्ट युनायडेची लढत केरळ ब्लास्टर्सविरुद्ध होईल. वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात येणाऱया या सामन्यातून बरोबरी साधल्यास नॉर्थईस्टला प्ले-ऑफचे स्थान मिळू शकते.
नॉर्थईस्टचा संघ आठ सामन्यांत अपराजित आहे. खलीद जमील यांच्याकडे प्रशिक्षकपदाची सूत्रे आल्यापासून त्यांची कामगिरी उंचावली आहे. त्यांनी खडतर सामन्यांत सनसनाटी निकाल नोंदविले आहेत. जमील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 18 गुणांची कमाई केली आहे. बाद फेरी गाठल्यास नॉर्थईस्ट अशी कामगिरी दुसऱयांदा करेल.
ब्लास्टर्सच्या कामगिरीला उतरती कळालागली आहे. अकरा संघांमधून त्यांचा शेवटून दुसरा क्रमांक आहे, पण जमील यांनी प्रतिस्पर्ध्याला कमी लेखू नये असे आवाहन आपल्या संघाला केले. ब्लास्टर्सचा संघ चांगला आहे. त्यांच्याकडे प्रतिभाशाली खेळाडू आहेत. त्यामुळे आम्हाला चांगली तयारी करावी लागेल. हा सामना आमच्यासाठी अवघड असेल. आम्ही गाफील राहता कामा नये. आम्हाला झुंज दय़ावीच लागेल, असे जमील म्हणाले.
नॉर्थईस्टला प्ले-ऑफसाठी एकच गुण आवश्यक असला तरी जमील यांची बरोबरी साधण्याची तयारी नाही. तयारीत कोणताही बदल होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही इतर कोणत्याही गोष्टीचा विचार केलेला नाही. तयारी सारखीच आहे. मैदानावर उतरून सर्वोत्तम खेळ करायचा आणि सर्व क्षेत्रात सज्ज राहायचे धोरण असेल, असे जमील म्हणाले.
जमील यांनी यापूर्वी यश प्राप्त केले आहे. ही लढत बरोबरीत सुटली किंवा विजय मिळाल्यास त्यांची अपराजित सामन्यांची मालिका नऊपर्यंत वाढेल. त्याचवेळी तीन पेक्षा जास्त साखळी सामन्यांत सुत्रे राहिलेले आणि बाद फेरी गाठलेले ते पहिले भारतीय प्रशिक्षक ठरतील. जमील यांनी नॉर्थईस्टचे प्रशिक्षकपद ही आतापर्यंतची सर्वांत खडतर जबाबदारी असल्याचे सांगितले. आयएसएलमध्ये मोठे आव्हान असते, तिथे आम्ही चांगल्या संघांना सामोर जातो आणि प्रशिक्षक दर्जेदार असतात. त्यामुळे हे आव्हान वेगळे आहे, असे जमील म्हणाले.
केरळ ब्लास्टर्सला गेल्या सात सामन्यांत विजय मिळालेला नाही. त्यांना केवळ स्वाभिमानासाठी खेळायचे आहे. हंगामी प्रशिक्षक इश्फाक अहमद या स्पर्धेतील मोहिमेची सांगता विजयाने करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. प्रत्येकासाठी सामने सारखेच आहेत. आमच्यादृष्टिने विजय नक्कीच हवा आहे. नॉर्थईस्टलाही जिंकायचे आहे. आम्हाला शेवट विजयाने करण्याची संधी आहे. नॉर्थईस्टला काय हवे आहे याचा विचार आम्ही करत नाही, तर आम्हाला काय हवे आणि काय करायला हवे याचा विचार करतो आहोत, असे अहमद म्हणाले.