आगामी काळ कसोटीचा आहे. वाझे प्रकरण आणि शंभर कोटी वसुलीचे टार्गेट हे काहीसे मागे पडले असे तूर्त वाटत असले तरी ही वादळापूर्वीची शांतता असावी. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पंधरा दिवसात सीबीआय या प्रकरणी अहवाल देणार आणि गुन्हा दाखल होणार असा कयास आम्ही या स्तंभातच व्यक्त केला होता आणि राजकारण आणि कोरोनाची दुसरी लाट या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळ कसोटीचा, परीक्षेचा असे म्हटले होते. देशात आणि महाराष्ट्रात जे काय सुरु आहे ते पाहता अंगावर काटा यावा, थरकाप उडावा अशी स्थिती आहे. कुणाचा कुणाला पोच नाही आणि संकटातही हात मारणारे, खिसा कापणारे आणि मडय़ाच्या टाळूवरील लोणी खाणारे कमी नाहीत. ऑक्सिजन सिलिंडर नाहीत, रेमडीसिव्हर इंजेक्शन नाहीत. सुसज्ज बेड राहू देत साधे बेड मिळत नाहीत अशी स्थिती आहे. ज्यांच्याकडून चांगल्या कामाची आशा, अपेक्षा ते दुसऱयांना दोष देत मोठ-मोठी भाषणे, आरोप-प्रत्यारोप यातच गुंतले आहेत. भ्रष्टाचार तर सुरुच आहे. काळाबाजार थांबलेला नाही. रेमडीसिव्हरची बोगस इंजेक्शने 35 हजाराला एक या दराने विकणारी टोळी बारामतीत जेरबंद झाली आहे. ही टोळी राजकीय नेत्यांचे फोटो गाडीवर चिकटवून बोगस इंजेक्शन्स विकताना रंगेहाथ सापडली आहे. याच वेळी नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, कुठे दवाखान्याला आग, कुठे कोरोना चाचणी निमित्ताने महिलेचा विनयभंग अशी असंख्य प्रकरणे समोर येत आहेत आणि कोरोना महामारी समस्या हाताळण्यात आपण कमी पडतो आहोत. महाराष्ट्र कमी पडतो आहे, याची क्षणोक्षणी जाणीव होते आहे. महाराष्ट्र ही मोठी शक्ती आहे. महाराष्ट्राकडे मोठा अनुभव व कर्तृत्व आहे. पण, महाराष्ट्र दिन समोर असताना महाराष्ट्र सैरभैर झाला आहे. याला जबाबदार कोण यापेक्षा यावर तोडगा काय हे महत्त्वाचे आहे. कशाचा कशाला ताळमेळ नाही. पण राज्यकर्ते राजकारणात आणि एकमेकांवर कुरघोडी करुन हात मारण्यात व्यस्त आहेत. असा धास्तावलेला महाराष्ट्र प्रथमच दिसतो आहे. तो कुणालाही शोभादायक नाही. सीबीआयने शनिवारी अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला आणि वाझे प्रकरणाची वात पुन्हा चेतावली गेली. आता देशमुखांच्या अटकेवर हे थांबते की राज ठाकरे म्हणाले तशी फटाक्याची माळच लागते ते बघायचे. शंभर कोटीची वसुली ही संघटित गुन्हेगारी आहे. त्यामुळे त्यात हप्ता देणारे-घेणारे, मागणारे, वाटणारे सारे गुन्हेगार आहेत. वाझे, परमबीर सिंग, अनिल देशमुख आणि मनसुख हत्येतील एक साक्षीदार पोलीस निरीक्षक यांचे सीबीआयने फास आवळायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे सचिन सावंतापासून जयंत पाटील यांचेपर्यंत ही सुडाची कारवाई म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधू लागली आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणात गडबड आहे असे म्हटले आहे. सीबीआयने प्राथमिक अहवाल द्यावा असे आदेश असताना सीबीआय धाडी कसे टाकते असा प्रश्न राऊत यांना पडला आहे. खरे तर पोलीस खात्याला आणि राजकीय मंडळींना संघटित गुन्हेगारी नवी नाही. हे शंभर कोटीचे प्रकरण फक्त एका वाझेंचे नाही. असे किती वाझे आणि किती टार्गेट असेल याचा अंदाजही लावता यायचा नाही. अधिकाऱयांच्या बदल्या विशेष करुन पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी यांच्या बदल्या आणि गृह, बांधकाम, पाटबंधारे, महसूल, आरोग्य अशी मलाईदार खाती यासाठीचा संघर्ष नवा नाही. तो महाराष्ट्रात जसा आहे तसा इतर राज्यातही आहे. त्यामुळे यात सरावलेले थोडे संवेदनाहीन बनले आहेत. पण भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे. मग तो रुटीनचा संघटित असो अथवा वैयक्तिक मोठे घबाड असो ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे ब्रीद वाक्य असेल तरच कडेवर ही कारवाई होईल अन्यथा सापडले ते भ्रष्टाचारी निसटले ते नेते अशी नेहमीची गोष्ट पुन्हा घडेल. वाझे यांनी जे पत्र लिहिले आहे त्यात अन्य काही नावे आहेत. या वाझेंची नियुक्ती व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले त्यांचे समर्थन हे समजून घेण्यासारखे आहे. पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या हा किती नाजूक व तप्त विषय असतो याचा अनुभवही महाराष्ट्राने नुकताच घेतला आहे. या बदल्या अनिल देशमुखांनी करायच्या की मातोश्रीचे निकटवर्तीय अनिल परब यावरून जोरदार सामना सुरु होता. शेवटी शरद पवार यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला व पोलिसांच्या बदल्या मुख्यमंत्रीच करतील असे सांगावे लागले होते. यावरुन या बदल्याचे इंगित स्पष्ट व्हावे. एकूणच सरकारच्या आणि अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनिल देशमुख यांना कोणत्याही क्षणी अटक होईल अशी शक्यता व्यक्त होते आहे. मुंबई-नागपूरसह देशमुखांच्या 10 मालमत्तांच्या ठिकाणी जे छापे पडले त्यामध्ये काही महत्त्वाचे कागद, डायऱया, हिशोब सापडले का यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. जयंत पाटील यांनी देशात न्यायच उरला नाही. सीबीआयचा गैरवापर सुरू आहे असे म्हटले आहे. एकूणच राजकारणात अनेकांचा श्वास अडला आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राणवायू घेणे-मिळणे कठीण झाले आहे आणि राजकारणामुळे अनेक जणांची झोप उडाली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने कोरोनापेक्षा राजकारण जीवघेणे आहे, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. आता परीक्षेचा काळ सुरु झाला आहे. कुणाकुणाच्या दांडय़ा उडतात आणि कशीकशी साफसफाई होते हे बघायचे. कोरोनाच्या नावावर जे सुरु आहे तो कदाचित गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक भ्रष्टाचार ठरेल पण रंगेहाथ सापडत नाही तोवर सारेच साव आहेत. तूर्त कसोटीचा काळ आहे. सर्वांच्याच परीक्षेचा कस लागणार आहे. राजकारण काहीही होवो कोरोनापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.
Previous Articleजाती न पूछो डॉक्टर की
Next Article जिल्हा रुग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजन प्लान्ट
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.