शेकडो कोटींच्या नुकसानीचा विसर : मल्टिलेव्हल कंपन्यांचे नव्याने फुटतेय पेव
प्रतिनिधी /बेळगाव
शेकडो कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणांचा छडा लागला नाही. तोच फसवणुकीच्या नव्या घटना वाढल्या आहेत. मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चुना लावण्यासाठी ठकसेनांनी मोठय़ा प्रमाणात जाळे टाकले आहे. झटपट श्रीमंतीच्या आशेमुळे कर्ज काढून लोक अशा कंपन्यात गुंतवणूक करतात. गुंतवणूक करताना जुन्या प्रकरणांचे काय झाले? याचा विचारही कोणी करीत नाहीत.
विजय बेल्लद व त्याच्या साथीदारांनी केवळ बेळगावच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यातील हजारो गुंतवणूकदारांना ठकविले. याच काळात आणखी एक मोठी फसवणूक झाली. अत्यंत नियोजनबद्धरित्या फसवणुकीच्या या कटाची आखणी करण्यात आली होती. पोलिसांनी सुरुवातीलाच नागरिकांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे कोणीच ऐकले नाही.
संजय बसाप्पा टेंगिनकाई हा ठकसेन गेल्या अनेक वर्षांपासून फरारी आहे. महात्मा फुले रोड परिसरात साई मल्टिसर्व्हिसेस नामक एक कंपनी त्याने सुरू केली होती. या कंपनीत दहा हजारांवर गुंतवणूक करायची होती. गुंतवणूकदारांना दरमहा दहा टक्के बावीस महिने नफा देण्याचे त्याने जाहीर केले.
गुंतवणूकदारांना बाँड करून दिले गेले. तुमचा पैसा किती आणि कसा सुरक्षित आहे, हे पटवून दिले जात होते. कारण आम्ही तुमचा पैसा इतर कशात गुंतवित नाही. एका ग्राहकाने जर एक लाख रुपये गुंतविले तर त्याच्या नावे मुऱहा जातीची म्हैस खरेदी केली जाते. मोठय़ा गोठय़ात म्हशी बांधून दुग्ध व्यवसाय केला जातो. यातून मिळणारा नफा गुंतवणूकदारांना परत केला जातो, अशी जाहिरातबाजी करण्यात आली होती.
सुतकट्टीजवळ हजार जनावरांचा गोठा उभारण्यात आला होता. हा गोठा पाहण्यासाठीच अनेक राज्यांतून शेतकरी यायचे. हरियाणा येथील कामगार या जर्सी गायी आणि मुऱहा म्हशींची देखभाल करीत होते. आम्ही दूध तर विकतोच त्याशिवाय हजार म्हशींच्या शेणापासून तयार झालेल्या खतालाही मोठी किंमत मिळते, असे सांगत नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात येत होता.
सांगली, कोल्हापूर, बेळगाव, गुलबर्गा, विजापूर, हुबळी-धारवाड बरोबरच तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधूनही या कंपनीत नागरिकांनी आपला पैसा गुंतविला. सुरुवातीला पोलिसांनी स्वतःहून एफआयआर दाखल केला. गुंतवणूकदारांना एक महिना परतावा मिळाला. दुसऱया महिन्यापासून तक्रारी सुरू झाल्या. म्हणून पोलिसांनी स्वतःहून एफआयआर दाखल केले. संजय टेंगिनकाईला अटकही झाली. जामिनावर त्याची सुटका झाली. त्यानंतर तो फरारी झाला, तो अद्याप सापडला नाही. संजय कुटुंबीयांसह ऑटोनगर येथे रहात होता. तो बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या पत्नीने माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली. आपल्या पतीचे अपहरण करण्यात आल्याची तिची फिर्याद होती. त्यामुळे गोंधळात भर पडली होती. 5 जून 2011 रोजी पोलिसांनी त्याच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते.
दहा वर्षांपासून संजय टेंगिनकाई फरारी
या प्रकरणाचा तपासही सीआयडीकडे सोपविण्यात आला. प्रशासनाने सुतकट्टी येथील त्याचा गोठा ताब्यात घेतला. मुऱहा म्हशींचा लिलाव करण्यात आला. लाखाची म्हैस 20 ते 25 हजारात विकली गेली. सीआयडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून संजय टेंगिनकाई फरारी आहे. तो परदेशात आहे, अशी चर्चा होती. मात्र, त्याला शोधण्याची तसदी कोणीच घेतली नाही. म्हशींचे दूध, दही, तूप आणि शेण कोणाला किती वाटायचे? याचा व्यवस्थित हिशेब घालण्यात आला होता. पोलिसांना तर सोडाच आता नागरिकांनाही संजय टेंगिनकाईचा विसर पडला आहे. शेकडो कोटी रुपयांचे फसवणूक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
200 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक
या कंपनीत गुंतवणूक केलेल्यांपैकी अनेकांनी आत्महत्या केली. गुलबर्गा येथील चंद्रकांत नाटेकर (वय 38) या गुंतवणूकदाराचा बेळगाव येथे खून झाला. या कंपनीत केलेली गुंतवणूक परत मिळत नाही म्हणून त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी संजय टेंगिनकाई विरोधातही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झटपट पैशांच्या आशेपोटी कर्ज काढून नागरिकांनी गुंतवणूक केली होती. या कंपनीत पोलीस अधिकाऱयांचीही बेनामी गुंतवणूक होती. म्हणून संजय टेंगिनकाई निर्धास्त होता. दहा-बारा वर्षांपूर्वी बेळगावसह अनेक राज्यांतील गुंतवणूकदारांना शेकडो कोटी रुपयांना गंडविल्याच्या घटना घडल्या. या फसवणूक प्रकरणांचे हेडक्वॉर्टर बेळगावात होते. साई मल्टिलेव्हल सर्व्हिसेस ही या अशाच विषारी रोपटय़ाची शाखा होती. एका अंदाजानुसार या कंपनीत 200 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक झाली होती.
जुन्याचा विसर, नव्याची सुरुवात
दहा-बारा वर्षांपूर्वी गुंतवणूकदारांना शेकडो कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. सीआयडी चौकशीही झाली. अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. गुंतवणूकदारांना नफा तर सोडा त्यांनी गुंतवलेली मूळ रक्कमही मिळाली नाही. नागरिकांना या जुन्या प्रकरणांचा विसर पडला आहे. कारण एका बेळगाव शहरात सध्या मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या बाराहून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. आपल्याकडे कोणीच तक्रार केली नाही, अशी सबब सांगत काही पोलीस अधिकारी या कंपन्यांकडे डोळेझाक करीत आहेत. प्राईझ चिट्स अँड मनी सर्क्युलेशन बॅनिंग ऍक्ट हा अशा कंपन्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी कायदा आहे. पोलीस या कायद्याचा वापर करत नाहीत. एखाद्या कंपनीकडून नागरिकांची लूट होत असेल तर आमच्याकडे कोणीही तक्रार केली नाही, असे सांगून कानाडोळा करण्याच्या पोलीस खात्याच्या भूमिकेकडेही समाज संशयाने पाहू लागला आहे.