उचगांव /प्रतिनिधी
पूरग्रस्त महिलांची कर्जमाफी त्वरित व्हावी व फायनान्स कंपन्यांची जीवघेणी वसुली तातडीने थांबवावी या मागणीसाठी निगडेवाडी (ता. करवीर) येथील नदीघाटावर जलआंदोलन करीत सायंकाळी पाच वाजता पंचगंगा नदीमध्ये मंडप घालून वीस महिलांनी उपोषण केले. याप्रश्नी तीन दिवसात निर्णय न झाल्यास प्रसंगी अन्य ठिकाणी जलसमाधी घेऊ असा इशारा छत्रपती महिला आघाडीच्या प्रमुख दिव्या मगदूम यांनी यावेळी दिला. या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.
सकाळी अकरा वाजता दिव्या मगदूम यांच्या नेतृत्वाखाली महिला तावडे हॉटेल नजीक जमा झाल्या. यावेळी शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील हजारो महिला आंदोलक व पोलिसांमध्ये बुधवारी सकाळी झटापट झाली. त्यात आंदोलक महिला आणि दोन पोलिस महिला कर्मचारी किरकोळ जखमी झाल्या. करवीरच्या तहसीलदारांसह प्रांताधिकारी यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. याप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, याप्रश्नी तीन दिवसात निर्णय न झाल्यास प्रसंगी अन्य ठिकाणी जलसमाधी घेऊ, असा इशारा छत्रपती महिला आघाडीच्या प्रमुख दिव्या मगदूम यांनी दिला. उपोषणाला बसल्यानंतर आंदोलक महिलांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलकांमध्ये बिस्मिला दानवडे, राणी कोळी, स्वाती माणगांवे, माधुरी जाधव, अलका बदामे, मनीषा कुंभार, अर्चना माळगे, प्रियांका दसते, प्रमिला कांबळे, नंदा गायकवाड, सूर्या मुजावर, अलमास तांबोळी या महिला उपस्थित होत्या. यावेळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ प्रशांत अमृतकर, गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर, शिरोलीचे किरण भोसले, गोकुळ शिरगावचे सुशांत चव्हाण, मनीषा नारायणकर, अतुल कदम आदी पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्त होता. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनची टीम, महापालिका अग्निशमन दलाचे जवान बोटीसह हजर होते. उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथकही तैनात होते.