वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शारीरिक तंदुरुस्ती मंत्राचा प्रसार करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘फिट इंडिया फ्रीडम रन’चे व्हर्च्युअल उद्घाटन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
सध्या कोरोना महामारी परिस्थितीने संपूर्ण जगामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून त्याला भारतही अपवाद नाही. ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबरपर्यंत आयोजित केली असून इच्छुक धावपटूंना त्यांच्या निवासस्थानापासून वेळेचे बंधन नसताना धावण्याची मुभा देण्यात आली आहे. संपूर्ण देशातील ही सर्वात मोठी शर्यत असून यामध्ये सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतीय रेल्वे, सीबीएसई आणि आयसीएसई स्कूल्समधील विद्यार्थी यामध्ये भाग घेणार आहेत. नेहरू युवा केंद्र संघटन आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम (एनएसएस) युवा विभाग त्याचप्रमाणे भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळातील प्रशिक्षणार्थी या शर्यतीमध्ये भाग घेणार आहेत. सुमारे 75 लाख धावपटू या शर्यतीत सहभागी होणार असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. मानवाच्या शारीरिक तंदुरुस्तीवर अधिक भर देणारे कॉर्पोरेट्स प्रोकेम आणि गोक्विल यांचाही यामध्ये प्रमुख वाटा राहील. ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ ही जनतेची चळवळ राहील, असा दृष्टीकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असल्याने हा दृष्टीकोन प्रत्यक्षात खरा ठरविण्याकरता ही शर्यत आयोजित केल्याचे क्रीडामंत्री रिजिजु यांनी सांगितले.