संसर्गाचा ‘बहरकाळ’ ओसरला : शास्त्रज्ञांचे प्रतिपादन, मात्र हिवाळय़ात दक्षता घ्यावी लागणार
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सप्टेंबरमध्येच कोरोना विषाणूच्या संसर्गाने त्याची सर्वोच्च पातळी गाठली असून आता त्याचा बहरकाळ ओसरला आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात नव्या रुग्णांची संख्या कमी होऊ शकते, असा निष्कर्ष शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या एका दलाने काढला आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाचा ‘परतीचा प्रवास’ सुरू होणार असून या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असेही या दलाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अब्जाहून अधिक भारतीयांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने अनेक नामवंत शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचे एक दल कोरोना विषाणूच्या प्रसाराची पाहणी करण्यासाठी मे महिन्यात नियुक्त केले होते. कोरोना फैलाव रोखण्यासाठी उपाय सुचविण्याचे उत्तरदायित्वही या दलाकडे सोपविण्यात आले होते. या दलाने सरकारने आजवर केलेल्या उपाययोजनांचा व्यापक आणि सविस्तर अभ्यास करून आपला निष्कर्ष घोषित केला. सरकारकडून या निष्कर्षाला प्रसिद्धी देण्यात आली आहे.
30 टक्क्यांमध्ये प्रतिकारशक्ती
व्यापक सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, 30 टक्क्यांहून अधिक भारतीय नागरिकांमध्ये कोरोनाविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती (अँटीबॉडीज) विकसित झाली आहे. याचाच अर्थ असा की या लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला होता पण त्यांनी त्यावर स्वतःच्याच बळावर मात केली. त्यामुळे आता या संसर्गाचा उत्युच्च प्रसाराचा काळ संपला आहे. साहजिकच आता रूग्णसंख्या रोडावू लागणार आहे.
काळजी घेणे आवश्यक
सर्व आर्थिक व्यवहार आता खुले करण्यात आले आहेत. सार्वजनिक स्थानी गर्दी वाढू लागली आहे. सार्वजनिक वाहनांमधूनही प्रवासाचे प्रमाण वाढले आहे. चाचण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. तरीही रुग्णसंख्या कमी होत आहे याचा अर्थ कोरोनाचे हटणे सुरू झाले आहे. मात्र, काळजी घेणे आवश्यक आहे. बेजबाबदारपणा दाखविल्यास पुन्हा रुग्णसंख्या वाढीला लागू शकते. त्यामुळे शारीरिक अंतर, हातांची वारंवार स्वच्छता आणि इतर नियमांचे पालन न कंटाळता आणि न चुकता आणखी काही महिने, किंवा एक दोन वर्षे करावेच लागणार आहे. त्यात ढिलाई येता कामा नये, असा इशाराही देण्यात आला.
हिवाळा परीक्षेचा ठरणार
आणखी एक महिन्यात देशभर हिवाळा सुरू होईल. विशेषतः उत्तर भारतात थंडीचे प्रमाण मोठे असते. या कालावधीत सरकार आणि जनता यांनी कसोशीने संसर्गापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंवाळय़ाचा हा काळ अग्निपरीक्षेचा ठरणार आहे. त्यात रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. कदाचित दुसरी लाट येऊ शकते. पण आरोग्यविषयक उपाययोजना पुरेशा प्रमाणात केल्यास व लोकांनीही पूर्ण काळजी घेतल्यास स्थिती नियंत्रणात राहू शकते.
रविवारी 62 हजार रुग्ण
शनिवारी संध्याकाळ ते रविवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये देशभरात नवे 61 हजार 871 नवे रुग्ण आढळले आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 72 हजारांहून अधिक आहे. त्यामुळे उपचारार्थी रुग्णांची संख्या आणखी कमी होऊन 7 लाख 83 हजार इतकी झाली आहे. गेल्या दोन आठवडय़ांमध्ये उपचारार्थी रुग्णांची संख्या दोन लाखांनी घटली असून ही समाधानकारक बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी करण्यात आले.
सणांच्या कालावधीत गर्दी टाळा
घटस्थापना, नवरात्र, दसरा, दिवाळी इत्यादी सर्व मोठे सण हिवाळय़ातच येतात. हे सण साजरे करण्यासाठी लोक गर्दी करतात. हा सणांचा कालावधी सुरळीत पार पाडायचा असेल तर गर्दी करणे टाळले पाहिजे. शारीरिक अंतराना नियम कठोरपणे पाळावयास हवा. समूहाने सण साजरे करणे कटाक्षाने टाळले पाहिजे, अशाही सूचना सरकारच्या वतीने जनतेला करण्यात आल्या आहेत.
सध्या कोरोनाच्या एकंदर रुग्णांनी 75 लाखांची संख्या गाठली आहे. ही संख्या जानेवारीपर्यंत 1 कोटीच्या वर जाऊ शकते. पण बरे होणाऱयांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यानंतर कोरोनाचा पारा खाली येण्यास प्रारंभ होईल आणि संसर्ग आटोक्यात येईल, असेही प्रतिपादन शास्त्रज्ञांनी गणिती अभ्यास व निरीक्षणांच्या आधारावर आपल्या अहवालात नोंदविले आहे.
काही ठिकाणी समूह संसर्ग
कोरोनाचे रुग्ण देशपातळीवर घटत असले तरी काही जिल्हय़ांमध्ये या विषाणूचा समूहसंसर्ग सुरू झालेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. मात्र यामुळे फारशा चिंतेचे कारण नाही. कोरोनाच्या प्रभावाखाली देशाचे नवे भाग आलेले नाहीत. केवळ 10 टक्के राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 80 टक्के रुग्ण आहेत. समूह संसर्ग झालेल्या जिल्हय़ांवर अधिक लक्ष पुरविण्यात येत आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.