ओपा पाणी पातळीत लक्षणीय घट : पातळी 3.36 मिटरपर्यंत आली खाली व्यवस्थेकडे खाते, सरकारचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / फोंडा
ओपा पाणी प्रकल्पातील नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या खाली उतरली असून ती ताडतीने समपातळीवर न आणल्यास येत्या काही दिवसांत फोंडा व तिसवाडी तालुक्यातील पाणीपुरवठय़ावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओपा येथील पाण्याची पातळी एवढी घटली नव्हती. यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ातच ती 3.36 मिटरवर पोचली असून त्यात 1 मिटरची घट झालेली आहे.
ओपा प्रकल्पाच्या माध्यमातून फोंडा व तिसवाडी तालुक्याला सुरळीतपणे पाणी पुरवठा करण्यासाठी उन्हाळय़ात किमान 4.36 मिटर एवढी पातळी संतुलीत ठेवावी लागते. अन्यथा जलशुद्धिकरण प्रकल्पावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
दरवर्षी मार्च महिन्यात गांजे, साळावलीहून खेचले जाते पाणी
पाण्याची ही पातळी संतुलीत ठेवण्यासाठी दरवर्षी मार्च महिना सुरु होताच, जलसंवर्धन खात्यातर्फे गांजे येथील नदीतून व साळावली धरणातून पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरु केली जाते. त्यासाठी गांजे व साळावली धरणावर पंप स्टेशन कार्यन्वित करण्यात आली आहेत. या पंप स्टेशनच्या माध्यमातून आवश्यक त्या प्रमाणात पाणी खेचून ओपा नदीत सोडले जाते. ज्यामुळे ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पाला फोंडा व तिसवाडी तालुक्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करता येतो.
यंदा मार्च संपायला आला तरी
जलसंवर्धन खाते सुस्त यंदा मार्च महिना संपत आला तरी जलसंवर्धन खात्याने ओपा नदीत पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरुच केलेली नाही. परिणामी ओपा येथील पाण्याची पातळी लक्षणीयरित्या खाली गेलेली आहे. सद्यस्थितीत ही पातळी किमान चार मिटरपर्यंत संतुलीत ठेवण्याची गरज आहे. ती साडेतीन मिटरच्या खाली गेल्यास फोंडा व तिसवाडी तालुक्यातील पाणी पुरवण्यात गंभीर स्वरुपाची टंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.