प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत मागील वर्षी 2019 साली सुमारे 16 गांजा प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. त्यातून सुमारे 10 लाख रूपयांचा अंदाजे अडीच किलो वजनांचा गांजासह चरस व इफेड्राईन ड्रग्स जप्त करण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एकंदर स्थितीत कोणतीच सुधारणा झालेली नाही. 2018 सालीही एकूण 16 गांजा प्रकरणांतून सुमारे 5563 किलोग्राम अंदाजे 10.77 लाखांचा जप्त करण्यात आला होता.
राज्यात सनर्बन सारख्या युवाईंच्या महोत्सवात अमलीपदार्थांच्या अतिसेवनामुळे मरण पावलेल्या युवकांच्या घटनामुळे अनेक पालकांनीही धास्ती घेतलेली आहे. तरीही राज्यभरातील पोलिस यंत्रणेला व सरकारला आजपर्यत अमलीपदार्थाचा मुंख्य स्रोत असलेल्या ठिकाणाचे थांगपत्ता व छडा लावण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे. पकडण्यात आलेल्या संशयितांवर कारवाईचा बडगा न बसता राज्यभरातील पोलीस स्थानकांच्या शर्यतीत तग धरून बसण्यासाठी केवळ तक्रारीची नोंद करण्यापुरतीच जबाबदारी प्रत्येक पोलिस स्थानक करताना दिसते. अमली पदार्थ बाळगलेल्या संशयितांचे नंतर काय होते, न्यायालयात पोलिसांची बाजू लंगडी ठरत असल्याने संशयित मोकाट सुटतात, संशयितांचेच साथीदार परत एकदा अमलीपदार्थ जाळयात ओढले जाऊन तोच कित्ता परत गिरवताना सर्रास चित्र आहे.
वर्षभरात 16 गांजा प्रकरणे
गेल्या वर्षभरात फेंडा पोलिसांनी उसगांव, सावईवेरे, माशेल, बोरी, हवेली कुर्टी, अशा विविध ठिकाणावरून मुद्देमालासह संशयिताना ताब्यात घेतले आहे. 16 अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी गजाआड करण्यात आलेल्या संशयितांमध्ये 7 गोमंतकीयांचा तर इतर 11 बिगरगोमंतकीयांचा समावेश असल्याचे आढळले आहे. राज्यात समुद्रकिनाऱयावर फोफावणारा आजार फोंडय़ासारख्या सांस्कृतीक राजधानीत सक्रिय होऊ लागला आहे. फोंडय़ातील शाळा-उच्च माध्यमिकात शिकणाऱया विद्यार्थ्यांच्या पालकांनाही शहरात फोफावलेल्या अमलीपदार्थाची धास्ती घेतलेली आहे. कारण मागील काही नोंदी पडताळल्यास अमलीपदार्थ जाळय़ात विद्यार्थीवर्ग ओढले जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे त्यामुळे पालक व शिक्षकांनी आपल्या पाल्याविषयी व विद्यार्थ्याप्रती सतर्कता बाळगावी असा सूर उमटू लागला आहे.
अमलीपदार्थ सेवनसाठी कठोर दंडाची तरतूद असूनही व्यसनाधीन झालेल्याना शिक्षेची पर्वा नसल्याचे दिसून येते. कारण संशयितांना अटक केल्यानंतर त्याचदिवशी किंवा दुसऱया दिवशी न्यायालयामार्फ जामिनावर सुटका करण्यात येते. त्यानंतर त्या संशयितावर पोलीसांनी लक्ष ठेवून त्यांच्या हालचाली टिपणे तेवढेच गरजेचे आहे. युवावर्ग होळीनिमित्त व रंगपंचमीदिवशी होणाऱया कार्यक्रमांतूनही या व्यसनात ओढले जात आहे. अशा कार्यक्रमास्थळी नियमाची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया
सरकार दरबारी शाळा, कॉलेजात अमलीपदार्थविरोधी दिनी जागृती मेळावे आयोजनापुरते ही मोहिम मर्यादीत राहिलेली आहे. एकलकोंडय़ा झालेली मनस्थिती आत्मविश्वास ढळल्याने काही मुले या अमलीपदार्थाच्या नशेत वळू लागतात. सेशल मिडीयाद्वारे या मोहिमेची जागृती होणे गरजेचे आहे. मोबाईलचा सदूपयोग याकामी व्हावा,नपेक्षा अशा प्रकारावर करडी नजर ठेवण्यासाठी उपाययोजना करावी.सनर्बनसारख्या युवाईंच्या कार्यक्रमात सर्रास अमलीपदार्थ उपलब्ध होत असल्याचेही पालकांनी याविषयी धास्ती घेतलेली आहे.
युवापिढीने मैदानी खेळावर लक्ष द्यावे – निरीक्षक मोहन गावडे
गोव्यात अमलीपदार्थ शेजारील राज्यातून होणाऱया मालवाहतूकीच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला. फोंडा पोलिस हद्दीत चार औद्योगिक वसाहती असून परप्रातींय तसेच अवजड वाहनांची ये-जा होत असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात गांजा उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसत आहे. व्यसनमुक्ती केंद्र व इतर स्वयंसेवी संस्थातर्फे अमलीपदार्थ जागृती कार्यक्रम स्वत: पोलीस दल पुढाकार घेत असल्याचे फोंडा पोलिस स्थानकांचे निरीक्षक मोहन गावडे यांनी सांगितले. मात्र बेजबाबदार युवापिढीला अमलीपदार्थाच्या ड्रगनरूपी विळख्यातून सहिसलामत बाहेर काढण्यासाठी पालकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे, त्यांना मैदानी खेळात रूची निर्माण करणे हा उपाय होऊ शकतो. अमलीपदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या संशयितांचे संपुर्ण कुटूंब कोलमडत असते. आज पोलीसदलाबरोबरच शिक्षक व पालकांनीही दक्ष राहणे तेवढेच महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली.
अमलीपदार्थप्रकरणी कायदा कडक करावा
एखाद्या तरूणाला अमली पदार्थाचे सेवन करताना आढळल्यास त्याला एनडीपीएस ऍक्ट 27 नुसार सहा महिन्याची शिक्षा आणि दहा हजार रूपयांचा दंड होऊ शकतो व तो स्वत: सेवन करून विक्री करताना आढळल्यास त्याच्यावर ड्रग्सच्या प्रमाणानुसार कारवाई केली जाते. यामध्ये कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त 20 वर्षाची शिक्षा होऊ शकते त्याशिवाय दहा हजारापासून दोन लाखापर्यंत दंडही होऊ शकतो. त्यामुळे आयुष्याच्या या वने मार्गावर जाणाऱया विद्यार्थ्याना समुपदेशनाची नितांत गरज आहे.