प्रतिनिधी/ फोंडा
राज्यात कोरोना महामारीच्या कहरामुळे दिवसाकाठी पन्नासहून अधिक लोकांचे बळी जात आहेत. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये सध्या जागा कमी पडू लागल्याने विविध भागातील मृतदेह फोंडा पालिकेच्या मुक्तीधाम या सार्वजनिक स्मशानभूमीत आणले जात आहेत. मागील पंधरा दिवसांत पन्नासहून अधिक कोरोना मृतांवर या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले आहेत.
फोंडा स्मशानभूमित दिवसाकाठी जास्तीत जास्त सहा मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय आहे. सध्या याठिकाणी येणारे चार ते पाच मृतदेह कोरोनाने बळी गेलेल्या लोकांचे असतात. बांबोळी येथील गोमेकॉत मृत पावणाऱया कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याने पणजीच्या सार्वजनिक स्मशानभूमीत सध्या जागा मिळणे कठिण बनले आहे. मडगावातही सध्या हीच परिस्थिती असल्याने दक्षिण व उत्तर गोव्याच्या विविध भागातून मृतदेह फोंडय़ातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. गेल्या पंधरा दिवसात पन्नास ते साठ मृत व्यक्तींवर फोंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी 26 जून रोजी कोरोनामुळे एकाच दिवशी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. कोरोनाचे राज्यातील ही पहिले बळी होते. त्यावेळी हे दोन्ही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावात आणण्यास त्यांच्याच गावातून विरोध झाला. अशा कठिण परिस्थीत फोंडा पालिकेच्या मुक्तीधाम सार्वजनिक स्मशानभूमीत या मृतांना शेवटचा अग्नी द्यावा लागला. फोंडय़ात बाहेरील मृतदेह जाळण्यावरुन त्यावेळी काहीसा विरोधही झाला. नंतर परिस्थिती बदलत गेली. कोरोनाबाबत लोकांमधील मानसिकतेतही बदल झाला व आपल्या माणसांचे मृतदेह अंत्यविधीसाठी गावातच स्वीकारले जाऊ लागले. गावातील पंचायतीच्या सार्वजनिक स्मशानभूमीतही आता ही सोय केली जात आहे. तरीही गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना मृतांचा आकडा ज्या झपाटय़ाने वाढत आहे, ते लक्षात घेतल्यास राज्यातील विविध नगरपालिकांच्या स्मशानभूमी अपुऱया पडू लागल्या आहेत.
स्मशानभूमितील त्या कामगारांना नाही उसंत…
कोरोनामुळे मृत्यू होणाऱया व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला मोजकेच कुटुंब सदस्य व नातलग उपस्थित असतात. घाई गडबडीत हे अग्नीसंस्कार उरकावे लागतात. अशावेळी चितेची लाकडे रचण्यापासून पुढील सर्व सोपस्कार फोंडा पालिकेचे कामगार लक्ष्मण भजंत्री व उद्देश गावडे हे मोठय़ा निष्ठेने पार पाडताना दिसतात. गेल्या आठ दिवसांत तर त्यांना जेवायलाही उसंत राहिलेली नाही. लागोपाठ पाच ते सहा चिता रचून मृत व्यक्तीचे पूर्ण दहन होईपर्यंत त्यांना थांबावे लागते. एखादा मृतदेह स्मशानभूमीत पोचायला रात्री उशिर झाला तरी ते थांबतात. सध्या इतर कारणामुळे मरण पावलेल्या व्यक्तीपेक्षा कोरोना बळींचे मृतदेह फोंडा स्मशानभूमीत जास्त जळताना आढळतात.