विधान परिषदेचे सभापती रामराजेंनी प्रश्न विचारणाऱ्या सभासदांचीच केली कानटोचणी
विकास सेवा सोसायट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातीलः पालकमंत्री बाळासाहेब पाटील
प्रतिनिधी / सातारा
गेल्या पाच वर्षापूर्वी वाटले होते का की बँकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घ्यावी लागेल. कोरोनाने सगळे आयुष्य बदलून गेलेले आहे. ऑफलाईन सभेऐवजी ऑनलाईन सभा घ्यावी लागत आहे. ज्या प्रमाणे बँक दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी, पुरग्रस्तांच्या पाठीशी होती. तशीच कोरोना काळातही सभासदांच्या पाठीशी भक्कमपणे आहे. या कोरोनाच्या संकटातून मार्ग निघेल, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सोसायटय़ांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 71 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, आमदार मकरंद पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, फलटणचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रामराजे म्हणाले, गेल्या पाच वर्षातील संचालक मंडळांची ही शेवटची सभा आहे. ज्या विकास सेवा सोसायटींनी 100 टक्के वसुली केली आहे. त्यांना बक्षीस द्यावे. त्यांचे कौतुक करावे. ज्यांनी सोसायटीबबत प्रश्न केले त्यांचे प्रश्न योग्यच आहेत परंतु बँकेला येणाऱया अडचणीबाबत तसेच येऊ घातलेलं कायदे याचा विचार करता अडचणीतुन मार्ग काढणे महत्वाचे आहे. बँकेचे अन सोसायटीचे विषय वेगळे आहेत. असा विचार न करता सर्वाना बरोबर घेऊन चालावे लागणार आहे. सहकार हा त्रिसुत्रीवर चालतो. मग सहकारी साखर कारखाना असेल, बँक असतील हे. कारखाना जर बंद पडला तर तेथील आर्थिक नाडी बंद पाडली जाते. स्थानिक बाजारपेठेवर ही परिणाम होत असतो. संचालक मंडळ बदलले तरी परंपरा कायम राहत असतात. त्याला जिल्हा बँक ही अपवाद नाही. कोरोनाने आपलं आयुष्य कस आहे हे दाखवून दिले. पाच वर्षापूर्वी आपल्याला वाटल होत का आज ऑफलाईन बरोबर ऑनलाईन सभा होत आहे त्यामुळे कोरोना आपल्या जीवनात कायम राहू शकतो अन त्यातून मार्ग काढायचा आहे हा विचार घेऊन पुढे जायचं आहे.
या जिल्ह्याने दुष्काळ, अतिवृष्टी पाहिला आहे. त्या संकट काळात मदतीला जिल्हा बँक नेहमीच पाठीशी राहिली आहे. अ याही संकटात बँक उभी आहे. अनेक अडचणीतून मार्ग काढला आहे त्यामुळे आगामी काळात याचा बँकेला नक्की फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्हा बँकेला परंपरा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण, किसन वीर आबा, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी ही बँक उभारण्यासाठी पुढाकार घेतला. अलीकडे कोरोनाच्या काळात शेतकऱयांना अडचणी आल्या पण बँकेने आर्थिक हात दिला. पवारसाहेबांनी वारंवार केलेल्या मार्गदर्शनानुसार शेतकऱयांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी सहकारमंत्री म्हणून निश्चित प्रयत्न केले. सहकार टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न राहतील. याशिवाय ज्या शेतकऱयांनी अल्प मुदत कर्ज माफ करण्यासाठी महात्मा फुलें कर्ज माफी योजना आणली होती.
कोरोनामुळे गेल्या पावणे दोन वर्षात अपेक्षित महसूल जमा झाला नाही. पहिली लाट गेली, दुसरी लाट ओसरत आहे. तिसरी लाट येणाऱ्याचे संकेत दिले गेले आहेत. एकंदर कोरोनाची परिस्थिती पहाता परिस्थती हाताळताना शासन पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पवारसाहेबांनी जी भूमिका घेतली त्या अनुषंगाने सारख कारखाने साखर उत्पाद्नाऐवजी इथेनॉलच्या उत्पादनाकडे वळू लागले आहेत. तसेच बेकिंगकचे काम तळागळात करणाऱया सोसायट्या सक्षम करण्यासाठी सहकार खात्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गोड गोड प्रश्न आणि गोड गोड उत्तरे
ऑन लाईन सभेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रराजे यांनी सुरुवातीला बँकेच्या परिस्थितीचा आढावा मांडला. त्यानंतर सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांनी प्रास्तविकात बँक कशी चांगली हे नेहमीप्रमाणे सांगितले. तर सभासदांना प्रश्न विचारण्याची संधी देताच प्रत्येक तुलक्यातून एका एका सभासदांनी गोडगोड प्रश्न विचारले त्यांना गोडगोड उत्तरे सरकाळे यांनी दिली. दरम्यान, खटाव आणि पाटणच्या सभासदांनी जरा खोचक प्रश्न विचारुन विकास सेवा सोसायट्याकडे लक्ष द्या, अशी विनंती केली.