ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधिश’ बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे अनधिकृत बांधकाम 15 दिवसात हटविण्याचे आदेश मुंबई पालिकेने राणेंना दिले होते. दरम्यान, राणेंनी बंगल्यावरील हातोडा टाळण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
राणे यांच्या 8 मजली आधिश बंगल्याचा 7 वा मजला वगळता इतर सर्व मजल्यांवर अनधिकृत बदल केल्याचे महापालिकेने 4 मार्च रोजीच्या पहिल्या नोटिसीत नमूद केले होते. त्यानंतर अनधिकृत बांधकामाची नोटीस के पश्चिम वॉर्डच्या नियुक्त अधिकाऱ्यांनी 11 मार्च रोजी मालक तसेच मेसर्स आर्टलाइन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांना पाठवली होती. 3 मार्च रोजी महापालिकेला अधिश बंगल्याच्या मालकाकडून/भोगवटय़ाकडून सहा पानी उत्तर मिळाले. मात्र त्यांच्याजवळ अन्य कोणतेही कागदपत्र नव्हते.
बंगल्याचे मालक नारायण राणे यांनी बंगल्यातील अनधिकृत बांधकामाबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही किंवा विवादित बांधकाम करण्यास परवानगी दर्शविणारी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे तुम्ही दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 475 अ अंतर्गत तुमच्यावर कारवाई करेल, असे पालिकेने दुसऱ्या नोटीसमध्ये म्हटले होते. पालिकेने दिलेला 15 दिवसांचा अवधी संपत आल्याने बंगल्यावरील हातोडा टाळण्यासाठी राणेंनी आता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.