जास्तीत जास्त रोजगार निर्मितीचे ध्येय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पायाभूत सुविधांनंतर आता सरकार बंदर क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करुन रोजगार निर्मिती करणार आहे. पाच वर्षात 1.25 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची योजना निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारेच आता बंदर क्षेत्रात 130 प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यामध्ये डेजिंगचे 7 आणि पर्यटनासाठी 10 बंदर प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
213 कोटी डॉलर्सच्या मदतीने महाराष्ट्रात बंदर निर्मिती केली जाणार आहे. पारादीप न्यू पोर्ट 116 कोटी डॉलर्सच्या गुंतवणूकीसह उभारले जाणार आहे. तसेच आंध्रमधील भावनापाडु पोर्ट 712.7 दशलक्ष डॉलर्सच्या खर्चातून बांधले जाणार असून कोचीन शिपयार्ड प्रकल्प हा लवकरच पूर्ण होणार आहे. सोबत केरळ, आंध्र, पुडुचेरी आणि दमनमधील 6 प्रकल्पांची बांधणी सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
देखभालीची व्यवस्था
निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत सदरचे प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकार भर देणार आहे. तर सोबत विविध टप्प्यावरील आवश्यक असणारी बंदर देखभाल करण्याची व्यवस्थाही राबविण्यात येणार आहे. साधारणपणे सरकारने 2024 पर्यंत पायाभूत सुविधा क्षेत्रात 100 लाख कोटी रुपये गुंतवण्याचे ध्येय ठेवले आहे. यामुळे पायाभूत सुविधांसह बंदर क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी यावेळी दिले आहेत.