भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना तहसीलदारांचे आश्वासन
प्रतिनिधी /खानापूर
बुधवार दि. 21 जुलै रोजी बकरी-ईद आहे. या दिवशी गो-हत्या होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी असे निवेदन खानापूर तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना सादर केले. तहसीलदारांनी निवेदनाचा स्वीकार करुन या दिवशी गो-हत्या होणार नाही याबद्दल प्रशासन विशेष दक्षता घेईल असे आश्वासन दिले.
बकरी-ईद दिवशी गो-हत्या होण्याची शक्यता असते. यासाठी तहसीलदार व पोलिसांनी तालुक्यात कुठेही गो-हत्या होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी अशी निवेदनात विनंती केली आहे. कर्नाटकातून गोव्याला जांबोटी, चोर्ला, खानापूर, हेम्माडगा, अनमोड, रामनगरमार्गे गो तस्करी होत असल्याचे प्रकारही घडत आहेत. यासाठी या तिन्ही मार्गावर 24 तास विशेष पोलीस बंदोबस्त ठेऊन गो तस्करीवर निर्बंध घालावेत अशीही मागणी निवेदनात केली आहे. यावेळी पंडित ओगले, बाळाराम सावंत, जॉर्डन गोन्साल्विस, आनंद सावंत यांनी विचार मांडले.
निवेदन देतेवेळी किरण तुडवेकर, पवन गायकवाड, राजू गुरव, रोहीत गुरव, पंकज कुटे, संजू गुरव, महेश गुरव, संजय मयेकर, मारुती जाधव, राज गावडे, पिंटू येळ्ळूरकर, विश्वजीत चव्हाण, गोपाळ भेकणे, रामदास गुरव, ज्ञानेश्वर गिचपतकर, शिवाजी चोपडे, परशराम गुरवसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.