- अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे ट्विट
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने बुधवारी छोट्या बचत योजनांवरील व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने सामान्य नागरिकांना झटका बसला. अनेकांनी नाराजगी व्यक्त केली त्यानंतर काही तासात बचत योजनांवरील व्याज दर कपातीचा निर्णय केंद्र सरकारकडून मागे घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमन यांनी याबाबत ट्विट केले आहे.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या लहान बचत योजनांवरील व्याजदर 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीत होते तेच राहतील, छोट्या योजनांवरील व्याज दरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून मागे घेण्यात आला आहे. हा आदेश चुकून निघाल्याचे सांगत व्याजदर जैसे थे राहतील असे त्यांनी म्हटले आहे.
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (1 एप्रिल ते 30 जून 2021) नवे व्याजदर जाहीर करण्यात आले होते. पीपीएफचा व्याजदर आधीच्या 7.1 टक्क्यांवरून कमी करून 6.4 टक्के करण्यात आला होता. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेचा व्याजदर आधीच्या 6.8 टक्क्यांवरून 5.6 टक्के करण्यात आला होता. तर सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला होता. टपाल खात्यावरील मुदत ठेवींवरील व्याजदर किमान 4.4 ते कमाल 5.3 टक्के एवढा करण्यात आला होता. एक वर्षांच्या मुदतठेवींवरील व्याजदर 5.5 वरून 4.4 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याज 7.4 वरून 6.8 टक्के करण्यात आले होते. तर किसान विकासपत्रांवरील व्याजदर 6.9 टक्क्यांवरून 6.2 टक्के करण्यात आले होते.