वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी बांधवांच्या आंदोलनाचा परिणाम दिसून आला. मंगळवारी भारत बंद असल्याने कांदा आवक घटली. याचा परिणाम कांदा दरात 500 रुपयांची वाढ झाली तर याउलट सफेद कांदा आवक जास्त झाली. त्यामुळे सफेद कांदा दरात 1500 रुपयांची घसरण झाली.
बेळगाव बाजारात बुधवारी 35 ट्रक कांदा आवक झाली तर मागच्या बाजारापेक्षा 20 ट्रक कांदा आवक कमी झाली. महाराष्ट्रातील बहुतांश कांद्याच्या बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे कांदा आवक घटली. याचा परिणाम दरात वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी बाबुराव मोहिते यांनी दिली.
बाजारातील 35 ट्रक कांदा आवकेपैकी दोन ट्रक कांदा कर्नाटकातील होता. यामध्ये सफेद कांदा एक ट्रक उर्वरित सर्व कांदा महाराष्ट्रातील होता. यामध्ये जुना कांदा आवक मोठय़ा प्रमाणात होती. यावषी प्रथमताच मध्यम कांदा आणि गोळा कांद्याचे भाव समसमान आहेत तर काही बाजारी मध्यम कांदा चांगलाच तेजीत जात आहे. दरवषी गोळा कांदा कायमच तेजीत असतो. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हॉटेल व्यवसायाने म्हणावी तशी तेजी घेतली नाही. त्यामुळे गोळा कांद्याला मागणी कमी झाली आहे.
बाजारात परराज्यातील 18 ट्रक बटाटा आवक होती. मागील बाजारपेक्षा बटाटा आवक कमी होऊनसुद्धा मागणीत घट झाली. याचा परिणाम बटाटा दरात 300 ते 500 रुपयांची घसरण झाली असल्याची माहिती व्यापारी टी. एस. पाटील यांनी दिली. बाजारातील 18 ट्रकपैकी इंदूरचा 7 ट्रक यामध्ये नवीन दोन ट्रक, आग्रा 4 ट्रक, तळेगाव 5, गुजरातचा दोन ट्रक बटाटा आवक विक्रीसाठी आली होती.
बाजारातील बटाटय़ाचे भाव
इंदूर 2800 ते 3400 रुपये
आग्रा 2500 ते 3000 रुपये
तळेगाव 2200 ते 2800 रुपये
गुजरात 2500 ते 3000 रुपये
नवीन 2500 ते 3200 रुपये
बाजारात बेळगाव बटाटा उत्पादक क्षेत्रामधून बटाटा आवक कमी येत आहे. स्थानिक बटाटा जवळपास संपुष्टात आला आहे. तुरळक प्रमाणात आवक होत आहे. आवक जावक स्थिर असल्याने स्थानिक बटाटय़ाचे भावसुद्धा स्थिर असल्याची माहिती व्यापारी विनायक प्रकाश पाटील यांनी दिली.
देशभरातील शेतकरी बांधवांच्या शेतकरी जाचक कायदा केंद्र शासनाने लादला आहे. याचा परिणाम शेतकरी बांधवांनी दिल्लीची नाकेबंदी केली आहे. याचा विपरित परिणाम बेळगाव कृषी उत्पादन समितीमधील रताळी बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे रताळी पिकाचे भाव 200 रुपयांनी कमी झाले आहेत. चांगल्या प्रतीच्या रताळी पिकाचा भाव 900 रुपये झाला आहे तर सर्वसाधारण रताळी 500 ते 800 रुपयाला विकली गेली आहेत. देशभरात शेतकरी बांधव आंदोलन तीव्र करत असल्याने बाजार समितीमधील व्यापारी बांधवांनी शनिवारी रताळी बाजारात विक्रीसाठी आणू नयेत, असे आवाहन केले आहे.