कणकवली:
अधिकारी येतात, कार्यभार सांभाळतात अन् ठराविक कालावधीनंतर बदली झाल्यामुळे कार्यभार सोडतात. सरकारी कार्यालयांमध्ये सातत्याने दिसणारे हे चित्र. निरोपप्रसंगी पुष्पगुच्छ, भेटी देणे, भाषणे करणे असे औपचारिक प्रकारही होतात. मात्र, कणकवली पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी अनोखा, विलक्षण, भावूक प्रसंग दिसला. बदलीनंतर कार्यभार सोडत असलेले पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यावर कर्मचाऱयांनी पुष्पवृष्टी करतानाच चक्क चरणस्पर्श करून त्यांना निरोप दिला. विशेष म्हणजे कोळी यांना निरोप देताना अनेक कर्मचाऱयांनाही अश्रू अनावर झाले होते.
कोळी हे गेली अडिच वर्षे कणकवलीत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची जिल्हय़ांतर्गत सागरी सुरक्षा दलाच्या प्रमुखपदी बदली झाली. सोमवारी सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्यांतर्गत कामावर अंतिम हात फिरवून ते केबिनबाहेर येत होते. मात्र, तत्पूर्वीच पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी केबिनबाहेर दोन रांगांमध्ये उभे होते. कोळी हे केबिनमधून पोलीस ठाण्याबाहेरील कारजवळ पोहोचेपर्यंत पुष्पवृष्टी सुरूच होती. तर कारही सजविण्यात आली होती.
या अनोख्या निरोपाने कोळीही भारावले. अडिच वर्षांच्या कालावधीत सर्व कर्मचाऱयांच्या साथीने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. आजचा क्षण म्हणजे त्याची पोचपावती असावी, असे उद्गार त्यांनी काढले.