सखोल तपास करण्याची मागणी : जनता क्रांती दलाचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / सातारा
पॉवर हाऊस परिसरात बबन हणमंत गोखले यांचा खून ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी तीन, चार चाकू पडले होते. ज्यांना आरोपी म्हणून पकडण्यात आले आहे ते दोन्ही आरोपी युवक गोखले यांच्या जवळचे होते. गोखले यांचा कोणाशी वाद नव्हता. मात्र ते या भागातील समाजसेवक व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष होते. अनेकांच्या झोपडय़ा वसवण्याबरोबरच त्यांना सुविधा देण्याचे काम त्यांनी केले होते. केवळ अंडी उधार दिले नाहीत म्हणून त्यांचा खून झाला आहे असे वाटत नाही. यामागे आणखी एक आरोपी असून त्याचे नाव पोलिसांनी दिले आहे. या खुनाचा सखोल तपास करावा, अशी मागणी गोखले यांच्या पत्नी अलका गोखले व जनता क्रांती दलातर्फे करण्यात आली.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. यावेळी बबन गोखले यांच्या पत्नी अलका गोखले, भटक्या, विमुक्त संघटनेचे प्रदेश सरचिटणीस प्रा. हणमंत नलवडे, जनता क्रांती दलाच्या, जिल्हाध्यक्ष पुजा भातकर, वडार संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र नलवडे उपस्थित होते.
बबन गोखले यांचा खून करणारे आरोपी शुभम कदम व सचिन माळवे हे स्वतःहून पोलिसात हजर झालेत. त्यांचे गोखले यांच्याशी दैनंदिन संबंध होते. काही दिवसांपूर्वी माळवे यांनी पॉवर हाऊस परिसरात मुलीची छेड काढली होती म्हणून बबन गोखले यांनी त्याला फटकावले होते. मात्र, तरी देखील दोन्ही आरोपी हे गोखले यांच्यापाशी असायचे. त्यांनी केवळ अंडी उधार दिली नाहीत म्हणून खून केला हे कारण नाही. त्यात आणखी एक राम साळुंखे नावाचा आरोपी असून पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही.
तसेच ज्या ठिकाणी खून झाला त्याठिकाणी तीन, चार चाकू पडले होते. मोठा दगड होता. तसेच गोखले हे सामाजिक काम करत असल्याने त्यांना छुपे विरोधकही निर्माण झाले असावेत. त्यामुळे समोर आलेल्या कारणापेक्षा वेगळे कारण या खुनामागे असून त्याचा खरा सुत्रधार शोधण्यासाठी आम्ही तपास अधिकारी सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांची भेट घेतली. यातील आरोपी माळवे मूळचा मुंबईचा असून तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याने पॉवर हाऊस परिसरात भांडणेही केलेली आहेत. त्यामुळे या खुनामागे केवळ हे दोघेच नसून तिसरा आरोपी राम साळुंखे यास अटक करावी तसेच खुनामागील खरा सुत्रधार शोधून आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी अलका गोखले यांनी यावेळी केली.
गोखले कुटुंबाला शासनाने मदत द्यावी
बबन गोखले हे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी झोपडपट्टी परिवर्तन घडवून आणले होते. अनेकांना ते मदत करायचे तसेच स्वतः कर्ज काढून त्यांनी दुकान सुरु करुन ते स्वतःचे कुटुंब चालवत होते. त्यांचा खून झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधार गेला आहे. त्यांच्या पत्नी व मुलाला मदत करुन शासनाने त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेश सरचिटणीस प्रा. हणमंत नलवडे यांनी यावेळी केली.