नराधमांना फाशी देण्याची मागणी- कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अवघ्या 9 वषीय चिमुरडीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे दिल्ली पुन्हा हादरली आहे. बलात्कारानंतर नराधमांनी तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. संबंधित घटनेतील नराधमांवर कारवाई करण्यासह फाशी ठोठावण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह संस्था-सघटनांकडून होत आहे. तसेच स्थानिकांनी न्याय आंदोलन करत संशयितांना फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. आपली परवानगी न घेताच घाईघाईत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला असून, आता या प्रकरणावरून राजकारण तापताना दिसत आहे. दरम्यान, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कायद्याखाली दोषींना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
दिल्लीतील छावणी परिसरातील नांगलगाव याठिकाणी मागास समाजातील एका नऊ वषीय मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. आतापर्यंत या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका पुजाऱयासह चौघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तर, आरोपींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात यावे, असे विहिंपने म्हटले आहे.
आई-वडिलांचा पुजाऱयावर आरोप
घटनेच्या वेळी माझी मुलगी स्मशानात पाणी आणण्यासाठी गेली होती. पुजाऱयाने मला काही क्षणांसाठी मुलीचा मृतदेह दाखवला. तिचे ओठ निळे पडले होते. पुजाऱयाने आमच्या मर्जीशिवाय मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मुलीला करंट लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पुजारी खोटे बोलत आहे. पुजाऱयानेच माझ्या मुलीवर बलात्कार केला असा आरोप मुलीच्या आईने केला आहे.
आमच्या समाजाच्या काही माणसांनी पेटलेली चिता विझवली आणि माझ्या मुलीच्या पायाला पकडून तिचा मृतदेह बाहेर ओढला. आम्हाला न्याय हवा. दोषींना शिक्षा द्या, असे पीडित मुलीच्या वडिलांनी मागणी केली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पुजाऱयासह चौघांना अटक केली आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
राहुल गांधींनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट
या घटनेनंतर दिल्लीतील राजकारण तापू लागले असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी देखील ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पीडितेच्या कुटुंबियांना सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. ‘मोदीजी, ज्याने कुणी पीडित दलिताची गळाभेट घेतली आहे त्यालाच त्यांचे दुःख समजू शकते. पीडितेला न्याय मिळवून देणे तर दूरच, पण तुमच्या तोंडून 9 वषीय मुलीच्या कुटुंबासाठी सांत्वनाचे दोन शब्दही बाहेर पडले नाहीत. कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी हाच संकल्प आहे’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.