बिजनौर किसान महापंचायत – प्रियंका वड्रा यांचा बोचणारा प्रश्न
वृत्तसंस्था/ बिजनौर
उत्तरप्रदेशच्या बिजनौरमध्ये कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवरून आयोजित किसान महापंचायतमध्ये काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. जनतेने काही अपेक्षा असल्यानेच नरेंद्र मोदींना दोनवेळा पंतप्रधान म्हणून निवडले, पण मोदींच्या शासनकाळात काहीच काम झालेले नाही. शेतकऱयांना नवे कायदे नकोत तरीही सरकार ते मागे घेण्यास तयार नाही, कुणाचं भलं बळजबरीने केलं जातं का असे प्रश्नार्थक विधान प्रियंका यांनी केले आहे.
तिन्ही कायदे शेतकऱयांसाठी नव्हे तर त्यांच्या भांडवलदार मित्रांसाठी लागू करण्यात आले आहेत. पण हा देश आंधळा नाही. 7 वर्षांपासून देशात काय घडतंय हे पाहत आहे. भांडवलदार मित्रांच्या हवाली पूर्ण देश करण्यात आल्याची टीका वड्रा यांनी केली आहे.
नवे कायदे नको आहेत असे शेतकरी म्हणत आहे, मग ते मागे का घेतले जात नाहीत? पंतप्रधानांना देशातील कोटय़वधी शेतकऱयांपेक्षा अधिक समजतं का? स्वतःच्या भल्यासाठी काय आहे आणि काय नाही हे शेतकरी जाणतात असे उद्गार प्रियंका यांनी काढले आहेत.
जग फिरण्यासाठी दोन विमाने
देशभरातील ऊस उत्पादकांना 15000 कोटी रुपयांचे देयक पंतप्रधानांनी अद्याप दिलेले नाही. पण स्वतःच्या जगभ्रमंतीसाठी 16 हजार कोटी रुपयांची दोन विमाने त्यांनी खरेदी केली आहेत. मागील 80 दिवसांपासून ऐन हिवाळय़ात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. लोकांनी मोदींना दोनवेळा का निवडले असा विचार कधीकधी येतो. आपल्यासाठी मोदी काम करतील अशी अपेक्षा असल्यानेच जनतेने त्यांना निवडले असेल. पहिल्या निवडणुकीच्या काळात बरेच काही बोलले गेले होते. मोदींनी शेतकरी, बेरोजगारी आणि अन्य मुद्दय़ांवर काहीच केले नसल्याचा आरोप प्रियंका यांनी केला आहे.