वृत्त संस्था/ अल अमिरात
मंगळवारी येथे होणाऱया यजमान ओमानविरूद्धच्या टी-20 सामन्यात बांगलादेश संघाला आगामी होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पात्रतेसाठी विजयाची नितांत गरज आहे.
अलीकडील कालावधीत बांगलादेश संघाने मायदेशामध्ये झालेल्या टी-20 मालिकामध्ये बलाढय़ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. पण, टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रतेसाठी सुरू असलेल्या लढतीत गेल्या रविवारी स्कॉटलंड संघाने बांगलादेशचा 6 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे बांगलादेश संघाला मंगळवारच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत यजमान ओमानवर विजय मिळविण्याची गरज आहे.
बांगलादेशसमोर सध्या भक्कम फलंदाजीची समस्या निर्माण झाली आहे. ओमानविरूद्ध बांगलादेश संघाला आपल्या फलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल. आयसीसीच्या होणाऱया आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एकूण 12 संघांचा समावेश आहे. बांगलादेश संघाला या स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध करावी लागत आहे. बांगलादेशचे नेतृत्व मेहमुदुल्लाकडे सोपविण्यात आले असून ओमानचे नेतृत्व झिशान मक्सूद करीत आहे. या सामन्याला मंगळवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.