दरवर्षीचा प्रकार मात्र कोणतीही उपाययोजना नाही : भूयारी मार्गाचे नियोजनच चुकीचे
प्रतिनिधी / पणजी
बांबोळी येथील गोमेकॉसमोर असलेल्या भूयारी मार्गात संततधार पावसामुळे पाणी भरले असून त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. तेथून वाहने काढणे धोकादायक बनले असून गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्य़ात तेथे ही समस्या उदभवते पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते आणि पाणी तुंबणार नाही म्हणून कोणताही कायमस्वरुपी उपाय केला जात नाही म्हणून वाहनचालकांत संताप व्यक्त होत आहे.
भूयारी मार्ग बांधल्यापासून पाणी तुंबल्याची समस्या कायम असून तेथे वाहने नेली की ती पाण्यातूनच काढावी लागतात. त्यामुळे वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. त्याशिवाय तेथे मोठे खड्डे पडल्यामुळे वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. भूयारी मार्गातील पाणी काढण्यासाठी पंपाची व्यवस्था आहे परंतु वीजेची सोय नाही आणि पाणी काढून वरती सोडले तरी ते पुन्हा भूयारी मार्गात येते आणि तुंबते म्हणून त्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करा अशी मागणी होत आहे. एकंदरित भूयारी मार्गाचे नियोजन चुकीचे होते असे दिसून आले आहे. शिवाय पाणी जाण्याचे नियोजनच करण्यात आलेले नाही. शाळांसाठी हा भूयारी मार्ग सोयीस्कर आहे पण सध्या शाळा बंद असल्याने त्याचा वापर गोमेकॉत जाण्यासाठी वाहनचालक करतात.