अचूक बातमी “तरुण भारत” ची, शुक्रवार, 7 मे, सकाळी 11.00
● जिल्ह्यात 2028 नवे बाधित ● रेमडिसिवीरचे नियोजनही अयशस्वी ● कोवॅक्सीनचा दुसरा डोस लांबणीवर ● तालुकापातळीवर नियोजनाची गरज ● सातारा, फलटण, कराडात स्थिती बिकट ● मृत्यू संख्याही वाढतेयच
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असून, लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशीही बाधितांची वाढ जराही कमी होताना दिसत नाही. शुक्रवारी 2028 रूग्णांची वाढ झाली असून एकूण 1 लाख 16 हजार 417 वर पोहचली आहेे. दरम्यान कडक लॉकडाऊन सुरू असला तरी रस्त्यावरील वेगवेगळ्या कारणांनी सुरू असलेली वर्दळ काही थांबलेली नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील स्थिती बिकट होत आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना बेड, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेडसाठी जिवाच्या आकांताने धावावे लागत आहे. या परिस्थितीत गेल्या एप्रिल महिन्यातही बदल झालेला नाही आणि मे महिन्यात परिस्थिती अधिकच बिकट होऊ पहात आहे.
तीन इंजेक्शन दिली…चौथे तुम्ही शोधा
कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच अनेक रूग्णांना रेमडिसिवीर इंजेक्शनची गरज भासत आहे. सहा इंजेक्शनचा कोर्स रूग्णांना लिहून दिला जातो. ज्या रूग्णालयात रूग्ण उपचार घेत आहे त्याच रूग्णालयात इंजेक्शनसाठी नोंदणी होऊन ते रूग्णांना दिले जाते. मात्र अपवाद वगळता अनेक रूग्णांना दोन किंवा तीन इंजेक्शनचा डोस दिला जातो आणि नंतरचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगत रूग्णांसह नातेवाईकांचा जीव टांगणीला लावला जातो. अशा ढिसाळ नियोजनामुळे रूग्णांचे नातेवाईक अक्षरशः इंजेक्शनसाठी रात्रभर धावाधाव करताना दिसत आहेत.
कोवॅक्सिनचा दुसरा डोस लांबणीवर
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात लसीकरण मोहिमेला वेग आला मात्र गेल्या पंधरा दिवसात लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला असून लसीकरणाला येणारांची प्रचंड गैरसोय व नाहक त्रास होत आहे. यातच कोविशिल्ड लसीचे थोडोफार तरी डोस उपलब्ध होत आहेत. मात्र कोवॅक्सीनला विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत. कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे ते आता दुसरा डोस वेळेत मिळेल का? या चिंतेत आहेत. कोवॅक्सिन लस पुरवठा झाल्यावर ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांनाच प्राधान दिले जात आहे असे प्रशासन सांगत असले तरी दुसरा डोस घेण्यासाठी लस कधी उपलब्ध होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
साताऱ्यासह सहा जिल्ह्याचा ऑक्सीजन पुरवठा बंद
सातारा जिल्ह्यासह राज्यात कोरोनाबाधितांच्या संसर्गाचा वेग वाढला आहे. सातारा जिल्ह्यात दररोज दोन हजारावर रूग्ण वाढत आहे. यातील अनेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी तीस मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होईल अशी व्यवस्था केली होती. त्यासाठी कर्नाटकातील बेल्लारी प्लांटमधून ऑक्सीजन पुरवठा करण्याचे आदेश होते. मात्र बुधवारी रात्रीपासून महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला. त्यामुळे सातारा सांगली, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांत ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण होऊन रूग्णांच्या अडचणी वाढू शकतात. यावर या जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी तत्काळ पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होत आहे.
गुरूवारी जिल्हय़ात एकूण बाधित 2028, एकूण मुक्त 1595, एकूण बळी 40
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने -577588, एकूण बाधित -116417, घरी सोडण्यात आलेले -92079, मृत्यू -2740, उपचारार्थ रुग्ण-21571