बार्शी / प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यात आता बार्शी शहरातील संचारबंदी आणि लॉकडाऊन संपण्याच्या तोंडावर असताना प्रशासनाने मुख्य बाजारपेठ ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे . या निर्णयावर बार्शी नगर परिषद विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी विरोध दर्शविला असून सलग पंधरा दिवसाचा लॉकडाऊन आणि आता मुख्य बाजारपेठ 14 दिवसाचा प्रतिबंध म्हणजे हे व्यापाऱ्यांवर ती आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांना वरती लादलेले संकट आहे. यातून प्रशासनाला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न विचारत या सुधारित प्रतिबंधित क्षेत्राला आपला विरोध दर्शविला, तर हे सुधारित प्रतिबंधित क्षेत्र तात्काळ रद्द व्हावे अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे दैनिक तरुण भारत संवाद शी बोलताना म्हणाले की ,बार्शी शहरातील प्रमुख बाजारपेठसह रहिवाशी भाग या सुधारीत प्रतिबंधित क्षेत्र आदेशाने आजपासुन १४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा अमानवी आणि नागरिकांची मुस्कटदाबी करणारा आहे. १७ जुलै पासुन सुरुवातीला १० दिवसाचा लॉक डाऊन त्यानंतर परत ५ दिवसाचा लॉक डाऊन आणि आता परत १४ दिवसाचा सुधारित प्रतिबंधित क्षेत्र आदेश म्हणजे प्रचंड संतापदायक आहे. एकीकडे पुन्हा लॉक डाऊन नाही म्हणायचे आणि दुसरीकडे असे चुकीचे आदेश कडून वेठीला धरायचे हे कदापि सहन केले जाणार नाही. विनाविलंब तात्काळ सदरचा अन्यायकारक आदेश रद्द करण्यात यावा ही विनंती प्रशासनाने लोकांना प्रशासना विरुध्द उठाव करण्यास प्रवृत्त करणारा हा आदेश तात्काळ रद्द करून लोक भावना जपावी.
या सुधारित प्रतिबंधित क्षेत्र आदेशामुळे भोसले चौक ते तुळशीराम रोड तिथून गवत गल्ली ते तेलगिरणी चौक असा संपुर्ण परिसर सील होणार आहे .हे धक्कादायक संतापदायक आहे . १० दिवसाचा लॉक डाऊन संपन्यापूर्वी नगरपालिका येथे व्यापारी लोकप्रतिनिधी च्या संयुक्त बैठकीत किराणा ही अत्यावश्यक सेवा ५ दिवसाच्या लॉक डाऊन काळात काही वेळ निश्चित करून चालु ठेवण्याचे ठरलेले असताना आदेशात मात्र त्याचा उल्लेख करण्यात आला नाही.
त्यामुळे आता प्रशासनाने लादलेला सुधारित प्रतिबंधित क्षेत्र आदेश म्हणजे व्यापारी आणि नागरिक यांच्यावर अन्याय करणारा असणार आहे त्यामुळे तात्काळ हा सुधारित आदेश रद्द करावा अशीही मागणी अक्कलकोटे यांनी यावेळी केली आहे.