कलर्सचा लोकप्रिय शो बालिका वधूमध्ये अभिनेत्री अविका गोरचे पदार्पण ठसा उमटवणारे होते. डोळ्यात अंजन घालणाऱया, बालिका वधूने भारतीय टेलिव्हिजनवर इतिहास निर्माण केला. बालविवाहसारख्या संवेदनशील विषयावर ही मालिका बेतलेली होती. आता, हा शो नोस्टॅल्जिक दुपारचा एक भाग म्हणून कलर्सवर पुन्हा प्रसारित होणार असल्यामुळे, अविकाने आनंदीची भूमिका साकारण्याचा अर्थ तिच्यासाठी काय आहे आणि तिच्या जीवनात त्याची कशी मदत झाली याविषयी तिने तिचे विचार सांगितले आहेत.
तिच्या सुपरहिट प्रथम पदार्पण शोमध्ये आनंदी साकारण्याविषयी बोलताना, अविका गोर म्हणाली, बालिक वधूने माझे जीवन पूर्णपणे बदलून गेले आणि मला अनेक गोष्टी शिकण्याची संधी त्यातून मिळाली. शो मधून पदार्पण केले त्यावेळी मी फक्त 9 वर्षांची होते, आणि माझ्यासाठी, त्यावेळी ते फक्त कामच नव्हते. बालिकावधू मध्ये अभिनय करणे हा एक छंद व आवड होती जे मी नंतर सुरू ठेवले आणि तेही मोठय़ा प्रमाणावर. प्रत्येक दिवशी नवीन पोशाख घालणे, लोकांचे खूप प्रेम मिळवणे, आणि टेलिव्हिजनवर दिसणे यात मला आनंद वाटत होता. त्याशिवाय, शो मध्ये निष्णात रंगभूमी अभिनेत्यांचा समावेश असलेले विलक्षण कलाकार सुध्दा होते. माझ्यासाठी, बालिका वधू म्हणजे फिल्म शाळाच होती ज्यात मला अभिनयाच्या अनेक सूक्ष्म छटा शिकायला मिळाल्या. मी सेटवरील सर्वात आनंदी व्यक्ती होते आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होते. आज मी जी काही आहे तशी अभिनेत्री बनवण्याचे श्रेय मी या शोला देईन. हा शो कलर्स वर पुन्हा प्रसारित होत आहे याचा मला आनंद आहे आणि मला आशा आहे की मागील काही वर्षात त्यांनी प्रेम केलेल्या आनंदी आणि जग्यासह व इतर सर्व पात्रांसह, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ते वेळ काढतीलच असे ती म्हणाली.