नवी दिल्ली : बिहारच्या मुख्यमंत्रिपदी नितीश कुमारच राहणार असून त्यांच्या नेतृत्वात आपल्या सर्वांना बिहारचा विकास करावयाचा आहे, असे निःसंदिग्ध प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बिहार व इतर राज्यांमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपने मिळविलेल्या विजयानंतर बुधवारी संध्याकाळी त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित केला. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
भाजपच्या दिल्लीतील राष्ट्रीय मुख्यालयासमोर हजारो कार्यकर्त्यांनी बुधवारी पक्षाचा विजय साजरा केला. याच कार्यकर्त्यांना नंतर मोदींनी संबोधित केले. संघटितरित्या लढल्यामुळे बिहारमध्ये आपल्याला उत्कृष्ट यश मिळाले. आपले केंद्र सरकार गरीब आणि शोषितांसाठी कार्यरत आहे. सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा या वर्गाला लाभ झाला आहे. त्यामुळे हा वर्ग नेहमी भाजपच्या पाठीशी उभा असतो. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारची कामे व योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
भाजपच्या सातत्यपूर्ण यशामुळे अनेकांच्या मनात आसूया आणि द्वेष उत्पन्न झाला आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांवर राग काढला जातो. काही राज्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. तथापि, असे निरपराध्यांचे रक्त सांडून मते मिळत नसतात, असा इशारा त्यांनी दिला.
कोरोना नियंणात प्रगती
केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटात दिलेले प्रोत्साहक पॅकेज, धान्यवाटप व इतर सुविधांमुळे अनेक अडचणग्रस्त लोकांना साहाय्य झाले. सरकारे वैद्यकीय सेवा तत्परतेने उपलब्ध केल्याने आणि योग्यवेळी लॉकडाऊन घोषित केल्याने लक्षावधी जीव वाचले. हा वाचलेला प्रत्येक जीव सरकारच्या सक्षमतेची साक्ष देतो. बलाढय़ आणि प्रगत देशांमधील कोरोना हाहाकार पाहता भारतात स्थिती बरी आहे, हे येथील जनतेचे यश आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.